एक्स्प्लोर
दुकानं आणि आस्थापना आता आठवडाभर सुरु राहणार!
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 हा अधिनियम 19 डिसेंबर, 2017 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.

नागपूर : नवीन अधिनियमामध्ये दुकान आणि आस्थापनांना आठवड्यातील 7 दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तेथील कामगारांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी देणं बंधनकारक असेल. लघू आणि छोट्या उद्योगांना याचा फायदा होणार आहे. या अधिनिमाअंतर्गत 10 पेक्षा कमी कामगार आहेत अशा आणि लघू व छोट्या आस्थापनांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी त्यांनी व्यवसाय सुरु केल्याबाबत केवळ विहीत कागदपत्रासह व्यवसाय सुरु केल्याची ऑनलाईन सूचना द्यायची आहे. त्या अर्जाची पोहोच पावती ऑनलाईन उपलब्ध होईल. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 हा अधिनियम 19 डिसेंबर, 2017 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी ) आणि इतर आस्थापनांना, तेथील कामगारांना या अधिनियमाच्या तरतुदींचा लाभ होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे ऑनलाईन व्यवसाय 24 तास कार्यरत असतात. त्यामुळे ऑफलाईन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्याशी सकारत्मक स्पर्धा करता यावी म्हणून या अधिनियम लागू करण्यात आला. आता कामगार नसलेल्या सुमारे 22 लाख आस्थापना मालकांना यातून सूट मिळणार आहे. तसेच सुमारे 12 लाख आस्थापना, ज्यामध्ये 10 पेक्षा कमी कामगार आहेत, त्यांना या अधिनियमाच्या आस्थापना उघडणं आणि बंद करण्याच्या व इतर तरतुदीतून सूट मिळाली आहे. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी आणि त्यात वृध्दी होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल. पर्यायाने तेथे अधिक कामगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सुमारे 35 लाख कामगारांना किमान वेतन तसेच औद्योगिक विवाद अधिनियमाच्या तरतूदी लागू राहतील. या अधिनिमाअंतर्गत कामगार हितार्थ अनेक तरतूदी आहेत. जसं की, ओळखपत्र देणं, प्रसाधन गृह, पाळणाघर, उपहारगृह या सोयी पुरवणं मालकांना बंधनकारक केलं आहे. राज्यातील दुकाने आणि आस्थापनेतील कामगारांना नैमित्तीक रजेची सवलत प्रथमत:च मिळाली आहे. या अधिनियमांतर्गत 08 नैमित्तिक रजा देणं बंधनकारक आहे. या अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा आहे. महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांच्या घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत सुरक्षित वाहन व्यवस्था, कामाच्या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता बाबत पुरेशा स्वरंक्षण असेल अशा ठिकाणी महिलांना त्यांच्या संमतीने रात्री 9.30 नतंर काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















