![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'मोदी नामा'ची जादू उतरली, 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या खेळावरच ठरेल : शिवसेना
एकेकाळी भाजप सोबत सत्तेत असलेली शिवसेना आता रोज भाजपवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहे. आज देखील सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजप नेतृ्त्वावर टीका केली आहे.
!['मोदी नामा'ची जादू उतरली, 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या खेळावरच ठरेल : शिवसेना Shiv Sena Saamana allegation on BJP PM narendra modi and suggestion to opposition parties 'मोदी नामा'ची जादू उतरली, 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या खेळावरच ठरेल : शिवसेना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/07/f45b8eb362c2d137072eecb46ea9dbd6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एकेकाळी भाजप सोबत सत्तेत असलेली शिवसेना आता रोज भाजपवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहे. आज देखील सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजप नेतृ्त्वावर टीका केली आहे. सामनामध्ये म्हटलं आहे की, '2024 चे लक्ष्य' वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. 'मोदी नामा'ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील असा सल्ला शिवसेनेने विरोधकांना दिला आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरू आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या ‘जत्रे’त येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरू असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील, असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.
सामनामध्ये म्हटलं आहे की, विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.
शिवसेनेनं म्हटलं आहे की, 19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाडय़ांची डागडुजी करून त्यांना बरे स्वरूप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये, असं लेखात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)