![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
NCP Crisis :निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट, आता नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. यावर 14 फेब्रुवारीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाकडून (Election Comission) निकाल देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिलं असून शरद पवार (Sharad Pawar) गट हा स्वतंत्र्य गट असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय स्पष्ट झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. या निकालाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहचली असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे याच निर्णयावर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे. हा निकाल 14 फेब्रुवारी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जो निकाल शिवसनेच्या बाबतीत दिला, तोच निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत दिला आहे. परंतु राहुल नार्वेकर यांचा निकाल शिवसेनेच्या निकालाहून वेगळा निकाल राष्ट्रवादीच्या बाबतील लागण्याची शक्यता आहे.
आमदार अपात्रतेचा निर्णय शिंदेंच्या बाजूने
काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल देत शिवसेना पक्ष हा शिंदेंचा असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र देखील केलं. राहुल नार्वेकरांच्या या निकालावर विरोधकांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली. तसेच निवडणूक आयोगाच्या आजच्या निकालामुळे राहुल नार्वेकर हे देखील सारखाच निकाल देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या पक्षात झालेल्या बंडाचा शेवटचा टप्पा हा राहुल नार्वेकरांचा आमदार अपात्रतेचा निर्णय हा असणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
शरद पवार काय भूमिका घेणार?
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)