![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Devendra Fadanvis : आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ: देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde Vs Shivsena : शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मार्गदर्शन केलं.
![Devendra Fadanvis : आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ: देवेंद्र फडणवीस Maharashtra Political Crisis BJP Devendra Fadanvis address to rebel shivsena MLA Mumbai Devendra Fadanvis : आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ: देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/05/61e181fc3578f3048fc04ce788aedd02_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: भाजप आणि शिवसेना कधी वेगळी होईल असं वाटलं नव्हतं, पण काही काळ आपण दूर झालो, आता आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता आपण मिळून महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ असंही ते म्हणाले. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताने ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आता आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. मूळ परिवार एक झाला आहे. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्याला ताकद दिली आहे. आता एकत्र वाटचाल करायची आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव आपल्याला सर्वांना मिळून प्राप्त करून द्यायचे आहे."
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी आमदारांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, "आज खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचं सरकार आपल्यासमोर आहे, बाळासाहेबांचे स्वप्न साकार झालं. या आधी सावरकरांचा अपमान करणारे सरकार होतं, दाऊससोबत संबंध असणारे लोक सरकारमध्ये होते. हे सारे अस्वस्थेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय हे पाहणे त्रासदायक होते. नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्दैवाने त्यात यश आले नाही. म्हणून आजची स्थिती निर्माण झाली आहे."
मुख्यमंत्री म्हणाले की, "आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही, तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षाच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेतच. त्यांना कामाचा अनुभव प्रचंड आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा मी आभारी आहे."
उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. पण हा व्हिप आम्हाला लागू होत नाही, बहुमत आमच्याकडे आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)