Maharashtra Monsoon Assembly Session Live Updates : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Maharashtra Monsoon Session Live Updates : पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Background
Maharashtra Monsoon Session Live Updates : राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतरचं एकनाथ शिंदेचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे.
शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून घमासान
गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र दिसणार आहे.
अधिवेशनात गाजणाऱ्या मुद्दे कोणते असतील?
1) मुसळधार पावसानं केलेलं शेतीचं नुकसान
2) पूरपरिस्थिती
3) रखडलेले प्रकल्प
4) वादग्रस्त आमदार आणि मंत्री
5) राज्यावरचं कर्ज
6) मागच्या सरकारच्या कामांची चौकशी
7) राज्यपाल नियुक्त 12 नावांवरून गदारोळ
येत्या 17 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे. दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला शोक प्रस्ताव, नवीन मंत्र्याची ओळख आणि शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यामध्ये रंगेल ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचं पहिलं पावसाळी अधिवेशन असल्यानं शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे तर अजित पवार, सुनिल प्रभू आणि नाना पटोलेंवर विरोधी पक्षाची मदार असणार आहे. सत्तेत असताना महाविकास आघाडीची एकजूट आता विरोधी पक्षात आल्यावरही कायम असेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. जे चित्र विधानसभेत पाहायला मिळाणार तशीच आक्रमकता विधानपरिषदेतही दिसणार यांत काही शंका नाही.
सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन
राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा हे सगळ्यांना माहीत; मिटकरींचा हल्लाबोल
भाजप नेता मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्वीटचे (Mohit Kamboj) राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी म्हटले. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्वीट कंबोज यांनी केले होते.
आता सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? : आदित्य ठाकरे
Maharashtra Monsoon Assembly Session : "हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली. सोबतच आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?" राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला (Maharashtra Monsoon Assembly Session) आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे बोलत होते.























