Maharashtra Lockdown & COWIN Registration LIVE | ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले, शासनाचे आदेश जारी
Maharashtra corona vaccination lockdown updates : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय होण्याचं अपेक्षित आहे. पहिला महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यातील मोफत लसीकरण आणि दुसरा म्हणजे लॉकडाऊन वाढणार की संपणार? कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व अपडेट्स या लाईव्ह अपडेटमध्ये....

Background
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संपायला अवघे दोन दिवस उरलेले आहेत. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढणार की संपणार याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत होणार आहे. राज्यातील लॉकडाऊन तसेच लसीच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळात काय निर्णय होतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत.
मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली पण तिसरी लाट येण्याआधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.
ज्यामध्ये सर्वात प्रथम लसीकरण, आयसीयू बेड्सची संख्या, जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत.
कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे.
लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडतोय. पण रुग्णसंख्या कमी करण्यात मोठी मदत होत आहे. 1 मे पासून लसीकरण सुरु करायचं आहे, राज्यात सध्या 4 हजार लसीकरण केद्र आहेत ते दुप्पटीनं वाढवायचे आहेत, 18 ते 44 पर्यंत साधारणत: साडेपाच कोटींच्या घरात संख्या आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी सरकारला नियोजन करायचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर नक्कीच याचा परिणाम राज्यातली कोरोनाची परिस्थिती सुधारण्यावर होईल असे मंत्री बोलतात.
राज्यात मोफत लसीकरण? आज निर्णय अपेक्षित
1 मेपासून केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, मोफत लसीकरण, लॉकडाऊन याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, या बैठकीत राज्यातील मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच मुख्यमंत्री यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
देशभरात येत्या 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांचा मोफत लसीकरण करण्यात आलं होतं. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. अशातच देशातील अनेक राज्यांनी 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले
ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले
अपुऱ्या अॅम्ब्युलन्समुळे नागपूर महापालिकेच्या 'आपली बस' सेवेच्या ताफ्यातील 25 बस रुग्णसेवेसाठी तयार
नागपुरात कोरोनाच्या फैलावामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात अॅम्ब्युलन्सची संख्या अपुरी ठरताना दिसत आहे. हीच स्थिती लक्षात घेऊन नागपूर महापालिकेच्या 'आपली बस' या परिवहन सेवेच्या ताफ्यातील 25 बसेस आता रुग्णसेवेसाठी तयार करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजन देत रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या बसेसमध्ये आवश्यक बदलही करण्यात आले आहेत. या बसेसमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था राहणार असून सोबत दोन अटेंडटही रुग्णाला रुग्णालयात नेताना बसमध्ये राहणार आहे. रुग्णसेवेसाठीच्या या बसेस गरजू नागरिकांना नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. शहरातील महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये अशा दोन बस 24 तास उपलब्ध राहतील तर महापालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त पाच बसेस उपलब्ध राहतील. गरजू नागरिकांनी प्रत्येक झोन कार्यालयातून या बससेवेसाठी संपर्क साधवा, असे आवाहन मनपाने केले आहे. दरम्यान, महापालिकेने 16 बसेस शववाहिका म्हणूनही उपलब्ध केल्या आहेत.























