पुण्यात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे सदस्याच्या दोन्ही मुलांचं धडाक्यात लग्न, कोरोना नियम धाब्यावर
दोनशे वऱ्हाडीची मुभा असताना तब्बल दोन हजार वऱ्हाडीच्या उपस्थित लग्न सोहळा पार पाडला. शिवाय वऱ्हातीला डिजेचा दणदणाटही केला.

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. अशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे राज्यात अजूनही काही निर्बंध कायम आहेत. मात्र या सगळ्या नियमांना खुद्द लोकप्रतिनिधीच हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांना फाट्यावर बसवत शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आपल्या मुलांचा जंगी विवाह सोहळा पार पाडला.
पुण्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनी मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची अक्षरशः ऐशी तैशी केली. दोनशे वऱ्हाडीची मुभा असताना तब्बल दोन हजार वऱ्हाडीच्या उपस्थित लग्न सोहळा पार पाडला. शिवाय वऱ्हातीला डिजेचा दणदणाट ही केला. त्यामुळं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. शिवाय कार्यालय सील करण्याच्या दिशेने पावलं देखील टाकलीत.
अध्यक्ष असताना लांडे हे राष्ट्रवादीत होते तर सध्या शिवसेनेत आहेत. 28 ऑगस्टला हा विवाह सोहळा पार पडला यासाठी हजारभर नावं असणारी पत्रिका त्यांनी छापली होती. तेव्हापासूनच या लग्नाला मोठी गर्दीवर अशी चर्चा होती. उलट त्याहून अधिक गर्दी झाली. जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. मी दोनशे लोकांची परवानगी घेतली होती. पण मी लोकांच्या गळ्यातील ताईत असल्याने अन मी त्यांच्या लग्नाला जात असल्याने ते आले. मला नियम तोडायचे नव्हते, असं स्पष्टीकरण लांडे यांनी दिलं.
पुण्यातील जुन्नर पोलिसांनी लग्नाच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांना नोटीस धाडली होती. त्या नोटिशीला केराची टोपली दाखवत, कोरोना नियमांची ऐशी-तैशी करत लांडे यांनी जंगी विवाह सोहळा पार पाडला. वरासाठी डीजेची भिंत उभारली होती. या दोन्ही प्रकरणी जुन्नर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले शिवाय लग्न पार पडलेलं महालक्ष्मी मंगल कार्यालय सील करण्याच्या दिशेने पावलं ही टाकलीत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीये. पण त्यांच्या आवाहनाला विरोधक थारा देत नाहीत. आता तर यात शिवसैनिकांची देखील भर पडली आहे. अशा बेफाम शिवसैनिकाची मुख्यमंत्री पक्षातून हकालपट्टी करणार की त्यांची पाट थोपटणार हे पाहणं महत्वाचं राहील.























