सावधान! 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा, आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होवू शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत ठेवावेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSR च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज व रस्ते पायाभूत सुविधासाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे. कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणात पाणी साठा, विसर्ग याचा नियमित आढावा घेण्यात यावा. संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन:- अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे.पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासुन बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.
संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संबधित जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक-
धाराशीव ०२४७२-२२७३०१, बीड-०२४४२-२९९२९९, परभणी- ०२४५२-२२६४००, लातूर - ०२३८२- २२०२०४, रत्नागिरी- ७०५७२२२३३, सिंधुदुर्ग-०२३६२- २२८८४७, पुणे- ९३७०९६००६१,सोलापूर- ०२१७-२७३१०१२, अहिल्यानगर ०२४१-२३२३८४४, नांदेड-०२४६२-२३५०७७, रायगड- ८२७५१५२३६३, पालघर- ०२५२५- २९७४७४, ठाणे- ९३७२३३८८२७, सातारा- ०२१६२- २३२३४९, मुंबई शहर आणि उपनगर- १९१६/०२२- ६९४०३३४४.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र २७ X ७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांक:- ०२२-२२०२७९९०,०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.
०००००
























