विरोधकांचं फेक नरेटिव्ह, मविआच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Devendra Fadanvis : महाविकास आघाडीच्या काळात अनेक उद्योग राज्याबाहेर गेले असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
![विरोधकांचं फेक नरेटिव्ह, मविआच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप Devendra Fadanvis live PC on Maharashtra investment and political dispute today Maharashtra Marathi News विरोधकांचं फेक नरेटिव्ह, मविआच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/05/61e181fc3578f3048fc04ce788aedd02_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असतानाच टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला, त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण गुंतवणुकीसाठी चांगलं नसल्याचं गुंतवणूकदार म्हणायचे असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्प हा आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करणारच असाही विश्वास त्यांनी दिला.
आमचं सरकार येऊन तीनच महिने झालं तरी चुकीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचं खोटं बोललं जात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, "काही लोकांनी बदनामीचा घाट घातला असून अडीच वर्षाच्या काळात केवळ भ्रष्टाचार आणि इतर कांड झालेत. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात तयार नव्हते. महाराष्ट्राची विसकटलेली घडी आम्ही जागेवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही गेल्या कॅबिनेटमध्ये 25 हजार कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत."
गुंतवणुकीचा बाप म्हणजे रिफायनरी, सर्वात मोठी म्हणजे तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेली गुंतवणूक, ही अद्याप होऊ शकलेली नाही. याला जबाबदार या आधीचे सरकार आहे. आता मला त्यांना सवाल आहे की त्यांना गुंतवणुकीबद्दल प्रश्न विचारण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विरोधक फेक नरेटिव्ह तयार करतायत
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं की फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. टाटा एअरबसच्या बाबतीत हीच गोष्ट लागू आहे.
नाणार महाराष्ट्रातच होणार
नाणार प्रकल्पावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकारला अडीच वर्षाच्या कालावधीत नाणार रिफायनरी प्रकल्प पूर्ण करता आला नाही. तो प्रकल्प तीन लाख कोटींचा असून त्यामुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याकडे यांनी लक्ष दिलं नाही. पण आता आम्ही तो प्रकल्प पूर्ण करणारच."
महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स हब होणार
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केलं असून भविष्यात महाराष्ट्र हे इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला केंद्राने दिलेली ही भेट आहे त्यामुळे मी केंद्र सरकारचं आभार मानतो असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टेक्स्टाईल पार्क होणार असून टेक्स्टाईल हबही होणार आहे. येत्या नवीन वर्षात बजेटपर्यंत किंवा त्यावेळी घोषणा करण्यात येणार आहे.
बच्चू कडू माझ्या फोनवर गुवाहाटीला गेले
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर बोलताना फडणवीस म्हणाले की, बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे त्यांनी कुणाशी सौदा केला हे म्हणणं चुकीचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)