![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
समुद्र टापूवर अडकून पडलेल्या खलाशांची सुटका करण्याची मागणी
मुंबई परिसरातील बेटांलगत साडेतीन हजारांहून अधिक खलाशी लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. मुंबईतील मड परिसरात 499 बोटी तर भाटी परिसरात 120 बोटी अडकल्या असून साडेतीन हजार खलाशी यामध्ये आहेत.
![समुद्र टापूवर अडकून पडलेल्या खलाशांची सुटका करण्याची मागणी Demand for release of sailors trapped on sea island due to corona lockdown समुद्र टापूवर अडकून पडलेल्या खलाशांची सुटका करण्याची मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06201559/palghar-news.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होत असल्यामुळे आपला देश पूर्णपणे लॉक डाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनचा फटका सर्व स्तराबरोबर कोळी आणि खलाशांना बसलेला आहे. मुंबईतील मड आणि भाटी या परिसरातील समुद्र टापुंवर साडेतीन हजारांपेक्षा जास्त खलाशी अडकून पडलेले आहेत.
संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव वाढत होता. भारतातही कोरोनाने शिरकाव केला होता. भारतातील विविध राज्यांसह मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जनता कर्फ्यू चं आवाहन केलं होतं. एक दिवसाच्या कर्फ्यू नंतर पुन्हा सुरळीत व्यवहार सुरू झाले होते. याच दरम्यान मुंबई परिसरातील काही खलाशी मासे पकडण्यासाठी समुद्राच्या आत गेले होते. मासे पकडून झाल्यानंतर जेव्हा ते किनारी आले त्यावेळी संपूर्ण देश लॉक डाऊन झालेला आहे, अशी त्यांना माहिती देण्यात आली. तसंच ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांनी थांबावं अशा प्रशासनाच्यावतीने त्यांना सूचनाही देण्यात आल्या होत्या.
मुंबई परिसरातील बेटांलगत साडेतीन हजारांहून अधिक खलाशी लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. मुंबईतील मड परिसरात 499 बोटी तर भाटी परिसरात 120 बोटी अडकल्या असून साडेतीन हजार खलाशी यामध्ये आहेत. या खलाशांकडे उपलब्ध असलेला अन्न धान्याचा साठा संपला असून राज्य सरकारने आपली या ठिकाणाहून सुटका करावी अशी मागणी या खलाशांकडून होत आहे. आपली आरोग्य चाचणी करून राज्य सरकारने आपल्या घरी सोडावं अशी विनंती हे खलाशी करत आहेत.
प्रत्येक बोटीवर सात ते दहा लोक मासे पकडण्यासाठी समुद्रात जात असतात. तसेच समुद्रात जात असताना त्यांच्यासोबत काही खाण्या पिण्याच्या वस्तू देखील असतात. मात्र देश लॉकडाऊन झाल्यानंतर जेव्हा हे खलाशी समुद्र किनारी आले त्यावेळी त्यांना बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला. तिथेच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. त्यामुळे हे सर्व खलाशी आहे त्या ठिकाणी आसरा घेऊन राहिलेले आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या खाण्या पिण्याच्या वस्तू आता संपलेल्या आहेत. काही स्थानिक लोकांकडून त्यांना अन्नधान्य पुरविला जात होतं , मात्र तेही आता कमी होत चाललेलं आहे. या सर्व खलाशांची आरोग्य तपासणी करुन या परिसरातून त्यांना त्यांच्या घरी जाण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
आमदार रमेश पाटील म्हणाले,मड आणि भाटी या टापुंवर मोठ्या प्रमाणामध्ये हे खलाशी अडकलेले आहेत. त्यांची या परिसरातून सुटका व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे असणारा अन्नधान्याचा साठा संपलेला आहे. त्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे. या खलाशांची सुटका व्हावी यासाठी मी प्रयत्न करत असून सध्या राज्य सरकारलाही या संदर्भातली माहिती देत आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून या खलाशांची सुटका करावी अशी मागणी देखील मी उचलून धरलेली आहे.
Retired Doctor on Work #Corona | निवृत्त डॉक्टर अधिकारी डॉ. किशोर पोखरकर पुन्हा रुग्णसेवेत, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला निवृत्त आरोग्य अधिकाऱ्याची साद!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)