Breaking News LIVE : राज्यात आज 6026 रुग्ण कोरोनामुक्त, तर 8296 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Breaking News LIVE Updates, 10 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आता दोन शिफ्ट; पदभार स्वीकारताच रेल्वेमंत्र्यांचा शिस्तीचा कार्यक्रम
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पदभार स्वीकारताच रेल्वे मंत्रालयाच्या कामाच्या स्वरुपात महत्वाचा बदल केला आहे. रेल्वे मंत्रालयाचं कार्यालय आता रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार असून कर्मचारी हे दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. हा निर्णय केवळ रेल्वे मंत्रालयापुरताच मर्यादित असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आपले पंतप्रधान रोज 18 तासांहून जास्त काम करतात आणि देशाची सेवा करतात. मग आम्ही मंत्र्यांनीही तसं करावं. भारतीय रेल्वे ज्या प्रमाणे 24 तास सुरु असते त्याच धर्तीवर आता केंद्रीय रेल्वेमंत्री यांची कार्यालयंही दोन शिफ्ट मध्ये सुरु राहतील, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. रेल्वे मंत्र्यांची कार्यालयं आता दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 7 त दुपारी 4 आणि दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियमांचं पालन करुन प्रत्येकी 50 टक्के अधिकारी आणि कर्मचारी या दोन शिफ्टमध्ये काम करतील.
विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण निश्चित करावं; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारनं देशभरात एकसुत्री धोरण निश्चित करावं, त्यासाठी केंद्र सरकारच्या नवनियुक्त नागरी उड्डाण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन धोरण निश्चित करण्यास प्रथम प्राधान्य द्यावं, असं मतं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं. यासंदर्भात केंद्र सरकारला 16 जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.कोणत्याही विमानतळाचं नामकरण करताना किंवा नाव बदलताना केंद्र सरकारनं एकसमान धोरण ठरवाव, अशी मागणी करत वकील फिलजी फ्रेडरिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच हे धोरण निश्चित होईपर्यंत नवी मुंबई विमानतळासह इतर विमानतळांच्याही नामकरणाबाबत राज्य सरकारनं पाठविलेल्या प्रस्तावांवर केंद्राने विचार करु नये, अशी विनंती याचिकाकर्त्यानी या याचिकेतून केली आहे. त्यावर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं विमानतळाच्या नामकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीवर अवलंबून राहू नका : सुप्रीम कोर्ट
माहितीच्या अधिकाराखाली मिळालेली माहिती ही विश्वसनीय असेलच असं नाही आणि वकिलांनीही न्यायालयातील खटल्यांमध्ये त्याचा पुरावा म्हणून संदर्भ देणं टाळावं अस महत्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाविरोधातील अपीलाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती संजिव खन्ना यांच्या बेंचने हे मत नोंदवलं. उत्तर प्रदेशातील गोरखपूर विकास प्राधिकरणाच्या मास्टर प्लॅनमध्ये एका जागेची निवासी जागा म्हणून नोंद आहे अशी माहिती याचिकाकर्त्याला माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाली होती. त्याचाच संदर्भ घेऊन याचिकाकर्त्यांने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने याचिकाकर्त्याचे हे मत स्वीकारण्यास नकार दिला.
राज्यात आज 6026 रुग्ण कोरोनामुक्त, तर 8296 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 6026 रुग्ण कोरोनामुक्त, तर 8296 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासात 179 कोरोना रुग्णांचा मृत्यू तर सध्या राज्यात 1,14,000 ॲक्टिव्ह रुग्ण
कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरण : अटकेत असलेल्या दोघांच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ
कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरण : अटकेत असलेल्या दोघांच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ. सापते यांचे व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे आणि मिस्त्री नरेश विश्वकर्मा हे दोघे अटकेत आहेत. मात्र मुख्य आरोपी लेबर युनियनचा राकेश मौर्य, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे हे तिघे अद्याप फरार आहेत. आत्महत्येला आठ दिवस उलटून ही मुंबई आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती ते लागलेले नाहीत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या हस्ते उद्या सकाळी साडे अकरा वाजता मनसेच्या पुण्यातील नवी पेठेत तयार करण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर इतर पक्षांतील कार्यकर्ते देखील भाजपमधे प्रवेश करणार आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शेतात काम करत असताना विज पडून 2 मजूरांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शेतात काम करत असताना विज पडून 2 मजूरांचा मृत्यू तर दोनजण जखमी. शनिवार दुपारीची घटना.
प्रवीण महाजन यांना महाराष्ट्र शासनाचा जलभूषण पुरस्कार जाहीर
नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते व जलअभ्यासक प्रवीण महाजन यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘जलभूषण पुरस्कार’ महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात झाला आहे. जलसंपदा, मृद व जलसंधारण तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता या क्षेत्रात रूट लेव्हलवर उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘जलक्रांतीचे जनक’ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॅा. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला 13 जुलै रोजी मुबंईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे