Imtiyaz Jaleel: नामांतरावरुन राजकारण तापलं; आजपासून खासदार इम्तियाज जलील बेमुदत उपोषणावर
Imtiyaz Jaleel : हे बेमुदत संप कधीपर्यंत सुरू राहील हे सांगता येणार नसल्याचं देखील जलील यांनी म्हटलं आहे.

City Name Changed News: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव (Dharashiv) करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने (State Government) अखेर परवानगी दिली आहे. मात्र याच निर्णयावरुन आता राजकारण तापले असून, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर आजपासून (4 मार्च) जलील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला (MIM Protest) बसणार आहेत. तर हे बेमुदत संप कधीपर्यंत सुरु राहील हे सांगता येणार नसल्याचं देखील जलील यांनी म्हटलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत होती. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर सत्तांतर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करत, औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. केंद्राने देखील याला परवानगी दिल्याने आता दोन्ही जिल्ह्यांचे नाव बदलण्यात आले आहे. मात्र याच निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे.
आजपासून बेमुदत उपोषण!
केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने आजपासून एमआयएम रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद नामांतर कृती विरोधी समितीच्या अंतर्गत हे उपोषण केले जाणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. तर आजपासून सुरु होणारे हे उपोषण कधीपर्यंत सुरु राहिल, याबाबत सांगता येणार नाही असा इशारा देखील जलील यांनी दिला आहे.
जलील यांच्याकडून पाहणी!
नामांतराच्या विरोधात आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु होणार असल्याने, जलील यांनी शुक्रवारी उपोषणस्थळाची पाहणी केली. उपोषणाला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत काही सूचना देखील पदाधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच सिटी चौक पोलीस स्टेशनला भेट देत आजच्या उपोषणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. त्यामुळे आजच्या उपोषणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर उपोषणास्थळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपोषणाला अनेक राजकीय संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
अखेर नामांतराच्या विरोधातील आंदोलनाची जलील यांच्याकडून घोषणा, शनिवारपासून बेमुदत उपोषण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
