एक्स्प्लोर
वंचित आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा सुटणार, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला बैठक
येत्या 26 ऑगस्टला वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असदुद्दिन ओवैसी यांच्यात चर्चा होणार आहे.
![वंचित आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा सुटणार, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला बैठक aimim and vanchit bahujan aghadi seat sharing issue for maharashtra vidhansabha will be solved sood वंचित आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा सुटणार, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला बैठक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/18225551/Asaduddin-Owaisi-MIM-Prakash-Ambedkar-Bharipa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : जागा वाटपावरुन वंचित बहूजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात बिनसल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तूळात आहे. एमआयएमनं आंबेडकरांकडे मागितलेल्या 100 जागांच्या संभाव्य यादीमूळे दोन्ही पक्षांत गेल्या काही दिवसांत अविश्वासाचं वातावरण तयार झाल्याचं चित्रं होतं. मात्र हा तणाव आता निवळण्याची चिन्ह आहेत. येत्या 26 ऑगस्टला वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असदुद्दिन ओवैसी यांच्यात चर्चा होणार आहे. हैदराबादेत येथील एमआयएमचे मुख्यालय असलेल्या 'दारुस सलाम' येथे ही भेट होणार आहे.
सध्या दोन्ही पक्षांच्या संबंधाबाबत अविश्वास असताना तो निवळण्यासाठी ओवैसींनी आंबेडकरांना भेटायला एक विशेष दुत पाठविला. औरंगाबाद येथील एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांच्यामार्फत ओवेसींनी एक विशेष संदेश आंबेडकरांसाठी पाठवला. मंगळवारी (दि.20) संध्याकाळी मुंबईतील वंचित बहूजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात कादरी यांनी ॲड. आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी डॉ. गफ्फार कादरी यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंद लिफाफ्यातील एक 'विशेष पत्र' प्रकाश आंबेडकरांकडे सुपूर्द केले.
मागील महिन्यात दिल्ली येथे प्रकाश आंबेडकर, खासदार ओवेसी, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि डॉ. गफ्फार कादरी यांच्यात बैठक झाली होती. यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय बोर्डाकडे 100 जागांची मागणी केली आहे. मात्र त्यावरूनच दोन पक्षांत काहीसं विसंवादाचं वातावरण तयार झालं आहे. एमआयएमच्या जागासंदर्भातील संभाव्य मागणीवर वंचितनं जाहीरपणे काही बोलणं टाळलं होतं.
वंचित आणि एमआयएममधील बेबनावाच्या चर्चेचं कारण काय?
लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एकत्र येण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. वंचित बहूजन आघाडी आणि एमएमआयनं लोकसभेत एकदिलानं काम करत तब्बल 41 लाखांवर मतं घेतलीत. आंबेडकरांचा दलित, मुस्लिम आणि ओबीसी फॉर्मुल्यामूळे औरंगाबादेत एमएमआयएमचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या जलील यांनी विधानसभेच्या 100 संभाव्य जागांची यादी वंचितच्या संसदीय मंडळाकडे दिली. या यादीत आंबेडकरांचा गढ असलेल्या 3 जागांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात विधानसभेचे एकूण पाच मतदारसंघ आहे. जिल्ह्यात अकोला महापालिकेतील एक नगरसेवक वगळता एमआयएमची जिल्ह्यात कुठलीच ताकद नाही. यामूळेच एमआयएमच्या यादीमूळे हे संबंध काही प्रमाणात ताणल्याचं चित्रं होतं.
26 ऑगस्टच्या आंबेडकर आणि ओवैसींच्या बैठकीनंतर या कटूतेवर पडदा पडतो का? याचं उत्तर मिळणार आहे. त्यासोबतच ओवैसींनी आंबेडकरांना पाठविलेल्या सीलबंद खलित्यात नेमकं दडलंय काय? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)