जालन्यात वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता; प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन
Weather update : पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना विशेष दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Weather update : मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार जालना (Jalna) जिल्ह्यात 10 ते 12 जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ताशी 30-40 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
यंदा पावसाचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. त्यामुळे 7 जून उलटूनही जालना जिल्ह्यात अजूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असताना आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच 12 जूनपर्यंत जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना विशेष दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
अशी काळजी घ्या
- ज्यात मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहु नये.
- वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
- गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नयेत.
- वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे.
- मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर रहावे.
- वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
- पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
- बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवात्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
- आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील दुरध्वनी क्र. 02482-223132 या वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















