एक्स्प्लोर

माझा विशेष | मुलाला मुलगी भेटते...तुम्हाला का खुपते?

या विषयावर बोलताना सर्वच राजकीय पक्ष, संघटनांचं त्या टारगटांना शिक्षा करण्यावर एकमत होतं. अगदी प्रेमी युगुलांसाठी वेगळा पार्क वगैरे करण्याच्याही कल्पना मांडल्या गेल्या. मात्र, त्याचवेळी मुला-मुलींनी जबाबदारीनं वागलं पाहिजे हा सूरही व्यक्त झाला.

मुंबई : जालन्यात आज घडलेल्या घटनेनं आज महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. प्रेमीयुगलांना टारगट मुलांनी मारहाण केली. मुलीसोबत अत्यंत विभत्स प्रकार घडला. यानंतर समाजमन ढवळून निघालं. या विषयावर माझा विशेष कार्यक्रमात चर्चा केली गेली. या चर्चेत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, मनसे नेत्या रूपा पाटील, पालक प्रतिनिधी म्हणून नयना भगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे, भाजयुमोच्या प्रेरणा होनराव यांनी सहभाग घेतला. या चर्चेत मान्यवरांनी असं कृत्य करणाऱ्या नराधमांच्या निषेध केला. सोबतच या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याचा सूर देखील या चर्चेतून निघाला. अशी मोरल पोलिसिंग चुकीची : विद्या चव्हाण  याविषयाची सुरुवात करताना राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण  म्हणाल्या की, आज व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मुलामुलींनी भेटू नये असं नाही. मोरल पोलिसिंग चुकीची आहे. हे प्रकार ताबडतोब बंद व्हावेत. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी. या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करावी. हे प्रकार महाराष्ट्रात होऊ नयेत यासाठी पोलीस दलांनी व्यवस्थित लक्ष घालावं, असं राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं. बघणाऱ्यांना पसंत नाही म्हणून अशी दादागिरी बरोबर नाही : नीलम गोऱ्हे  शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, दबंगगिरीचा प्रकार आहे. बघणाऱ्यांना पसंत नाही म्हणून तुम्ही अशी दादागिरी बरोबर नाही. हा दादागिरीपेक्षाही मुलीसोबतचे वर्तन अत्यंत विभत्स आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्या मुलामुलींचे वर्तन चुकीचं आहे की नाही हा भाग वेगळा आहे. या युगलांनी तक्रार का केली नाही? हा प्रश्न आहे. या मुलांनी तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामुळे आयटी ऍक्ट देखील लावला गेला आहे. थोडं पुढं जाऊन बोलायचं झालं तर प्रेमीयुगलांसाठी गार्डन तयार केली जावी अशी मागणी होऊ लागली आहे. मैत्रीत पुढं गेल्यावर मुलीला सर्वाधिक त्रास होतो. अशा प्रकरणात मुलींना सर्वात जास्त त्रास होतो, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. संतापजनक आणि चिंताजनक प्रकार : तृप्ती देसाई  हा संतापजनक आणि चिंताजनक प्रकार आहे. भर दिवसा हा प्रकार घडतो. बेटी बचाव म्हणतो आणि महिला दिवसाही सुरक्षित नाहीत. या प्रकरणी तातडीने कारवाई करावी. जामीन होऊ नयेत. यासाठी राज्य सरकारने कडक कारवाई कशी करता येईल हे पाहावं, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं. या दोषींवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, असं त्या म्हणाल्या. युगलांना भेटण्यासाठी सुरक्षित जागाच नाहीत : रुपाली पाटील  ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे. या घटनांमध्ये बाकीचे प्रश्न आणू नये. मुलगा आणि मुलगी गप्पा मारताना अशा पद्धतीचं मोरल पोलिसिंग नको. सुदैवाने मुलीसोबत वाईट घटना घडली नाही. त्या मुलीला अधिकार आहे जो कुणी आवडत असेल त्याच्याशी गप्पा मारण्याचा. या नराधमांना त्यांच्यासोबत वागायचा काय अधिकार आहे, अशी भूमिका मनसेच्या रुपाली पाटील यांनी मांडली. चुकीच्या गोष्टी करत असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र युगलांना भेटण्यासाठी सुरक्षित जागाच नाहीत. भेटणं हे गैर नाही. मुलांकडून पालकांशी संवाद केला जावा मात्र आजचा विषय वेगळा आहे. आज ते युगल काहीही गैर करत होते असं दिसत नाही. आक्षेप घ्यावा असं काही नाही. जर आक्षेपार्ह काही करत असतील तर कायदा आहेच की, असं त्या म्हणाल्या. बदनामी करण्याच्या दृष्टीने क्लिप काढली : पूजा मोरे  ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. टोळक्याला ही घटना चुकीची वाटली. मात्र चुकीचं वाटत असेल तर समजही देऊ शकले किंवा आईवडिलांना देखील सांगू शकले असते. असते मात्र बदनामी करण्याच्या दृष्टीने ही क्लिप काढली. हे खूप घातक आहे. कमी वयात काही चुका आमच्यासारख्या तरुणांकडून घडत असतील मात्र समज देण्याची ही पद्धत नाही. आता या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी कुण्या राजकीय लोकांनी हस्तक्षेप करु नये, अशी भावना देखील मोरे यांनी बोलून दाखवली. मुलांनी सामाजिक भान राखणं गरजेचं : नयना भगत  समाजात नैतिकता किती खालावत चालली आहे हे या उदाहरणातून समोर येत आहे. निर्भया असो किंवा हैदराबादची केस असो हे गंभीर आहे. प्रत्येक आईसाठी ही भेदरवून टाकणारी घटना आहे. आधी म्हटलं जायचं की रात्र वैऱ्याची आहे मात्र आता दिवस देखील वैऱ्याचा ठरत आहे. मुलांनीही प्रेम करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवं. सामाजिक भान राखणं गरजेचं आहे. प्रेम हा गुन्हा नाही मात्र ते व्यक्त करताना भान राखणं आवश्यक आहे. लग्नाचं अमिश दाखवून बलात्कार केला जातो अशी अनेक प्रकरणं घडत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलामुलींना नैतिक शिक्षण देणं गरजेचं आहे. माझा भेटीला आक्षेप नाही मात्र आईवडिलांना सांगावं. आईवडिलांनी मित्र मैत्रिणीसारखं वातावरण ठेवावं : प्रेरणा होनराव  या मुलांचं वय आहे. या वयात पालकांचं किंवा शिक्षकांचं किती ऐकतात? हा मोठा प्रश्न आहे. या गोष्टी या वयात घडू शकतात. आईवडिलांनी मित्र मैत्रिणीसारखं वातावरण ठेवावं. मात्र आज बहुतांश ठिकाणी मुलं अशा गोष्टी आईवडिलांशी बोलू शकत नाहीत. या ठिकाणी मोरल पोलिसिंग आजिबात नाही. राज्य सरकारने या घटनेत गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी. चर्चेचा सार काय? मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटले! म्हणजे काहीतरी लफडं असणार, ही समाजाची सर्वसाधारण मन:स्थिती असते. त्यामुळेच मुला-मुलींनी एकमेकांशी फिरणे तर सोडाच, पण बोलूही नये, असे सामाजिक नीती-नियम तयार होतात. घरात अशा नियमांची अंमलबजावणी पालक-नातेवाईक करतात. तर, बाहेर त्यांची 'जबाबदारी' स्वयंघोषित संस्कृती रक्षक घेतात. एकवेळ घरच्यांची काळजी, सामाजिक भान, सभोवतालच्या घटनांची पार्श्वभूमी समजून घेता येईलही. मात्र, ज्यांच्या स्वत:च्या नैतिकतेचा पुरावा नाही अशांनी संस्कृती रक्षणाचा विडा उचलावा म्हणजे मोठाच विनोद. अर्थात, हा विनोद एक क्रूर थट्टा बनतो जेव्हा जालन्यासारखी घटना घडते. जालन्यात एके ठिकाणी भेटायला आलेल्या मुला-मुलीला पाच टारगटांनी घेरलं आणि दमदाटी केली. "घरी कळवतो, फोन नं दे..." वगैरे भिती घालण्याचा प्रयत्न केला. मुलगा-मुलगी घायकुतीला आले. त्यांनी विनवण्याही केल्या. मात्र, त्या टारगटांनी हा सर्व प्रकार शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी आरोपींना पकडलं आहे. या विषयावर बोलताना सर्वच राजकीय पक्ष, संघटनांचं त्या टारगटांना शिक्षा करण्यावर एकमत होतं. अगदी प्रेमी युगुलांसाठी वेगळा पार्क वगैरे करण्याच्याही कल्पना मांडल्या गेल्या. मात्र, त्याचवेळी मुला-मुलींनी जबाबदारीनं वागलं पाहिजे हा सूरही व्यक्त झाला. नकळत्या वयात किंवा विविध आकर्षणांमुळे मुलगा-मुलगी एकत्र येतात. त्यांची मैत्री होते. मात्र, त्याची परिणती कशात होईल याची कल्पना नसते. अनेकदा अशा प्रकरणात अजाण मुलींची फसवणूक होते. अशी चिंताही व्यक्त करण्यात आली. मात्र, काही प्रतिक्रिया फारच टोकाच्याही पाहायला मिळाल्या. उदा. मुला-मुलीनं भेटायला जाण्यापूर्वी घरी सांगायला हवं, मुलानं मुलीशी मैत्री करताना तिची जबाबदारी घ्यायला हवी वगैरे. अशावेळी कुणाच्याही मनात येईल, की नकळत्या, उमलत्या वयात इतका विचार मुलगा-मुलगी करील का? मुळात, त्यांच्याकडून अशा विचारांशी अपेक्षा तरी करता येईल का? सर्वात महत्वाचं म्हणजे मुला-मुलींच्या भेटण्या-बोलण्याबद्दल कळल्यास, त्यांना एकदम भयंकर अपराध केल्यासारखं जर पालक-नातेवाईक-शेजारीच वागवणार असतील तर त्या मुला-मुलीनं कुणाच्या तोंडाकडं पाहावं? यावर आपल्या मुला-मुलींशी संवाद, त्याचं विश्व जाणून घेणं, बहरण्याचं स्वातंत्र्य देतानाच जबाबदारीची जाणीव करून देणं हाच समंजस मार्ग ठरतो. हे झालं कुटुंबाचं. मात्र, समाजातील संस्कृती रक्षकांचं काय? त्यांची दंडेलशाही सहन करायची का? जालना प्रकरणातील त्या मुला-मुलीला छळणारे स्थानिक तरूण होते. मात्र, 14 फेब्रुवारीच्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी काही संघटना अंगात संस्कृती संचारल्यासारखा आव आणत याला बडव, तीला पकड, असं वागतात. राजकीय पक्षांचा वरदहस्त आणि धर्म-संस्कृतीचं नाव घेतलेली ही टाळकी मग महाविद्यालयं, तरूणाईचे कट्टे यात दहशत पसरवतात. त्यांना पाहूनच जालन्यासारखे प्रकार आज गावोगावी घडताना दिसतात. मात्र, त्या संघटनांवर कधीच कारवाई होत नाही. जालन्याच्या घटनेनं हे सर्व मुद्दे पुन्हा आपल्यासमोर आणून ठेवलेत. ज्याचा सारांश हाच की, आपल्या मुला-मुलींबद्दल कुटुंबानं, समाजानं विचार न केल्यास ते अशाच टारगटांचं लक्ष्य ठरत राहतील.

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Amravati Fire Baby Death: अमरावतीच्या नवजात शिशू कक्षात अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; पाच वर्षांपूर्वी भंडाऱ्यातही अशीच घटना, 10 बाळांचा झाला होता मृत्यू
अमरावतीच्या नवजात शिशू कक्षात अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; पाच वर्षांपूर्वी भंडाऱ्यातही अशीच घटना, 10 बाळांचा झाला होता मृत्यू
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
Marathi Compulsory Auto Taxi Driver: मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
Nagpur Chlorine Gas Leakage: नागपुरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
नागपुरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
Embed widget