Odisha Train Accident: ओडिशा दुर्घटनेनंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांची हात जोडून प्रार्थना, पाहा Video
Balasore Train Accident: ओडिशातील बालासोर येथे सुमारे 51 तासांनंतर अपघातस्थळावरून पहिली ट्रेन निघाली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

Train movement resumes in Balasore: ओडिशाच्या (Odisha) भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर (Balasore Train Accident) येथील अपघातग्रस्त (Accident) भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडी रवाना झाली.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केलं की, "अपघातग्रस्त डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. या भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे." तसेच, या ट्वीटनंतर काही वेळानं त्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आणि सांगितलं की, अप-लाईनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाली आहे."
तब्बल दोन दिवसांनी अपघातग्रस्त भागातून ट्रेन रवाना झाली. आता या ट्रेनचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. बयाना रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जाताच रेल्वेमंत्र्यांनी हस्तांदोलन केलं, त्यानंतर ट्रेनकडे पाहुन रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले आणि प्रार्थनाही केली. यावेळी रेल्वेमंत्री काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
अपघातानंतर पहिली ट्रेन रवाना होतानाचा व्हिडीओ :
#WATCH | Balasore, Odisha: Train movement resumes in the affected section where the horrific #BalasoreTrainAccident happened that claimed 275 lives. Visuals from Bahanaga Railway station. pic.twitter.com/Onm0YqTTmZ
— ANI (@ANI) June 4, 2023
रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. एका व्हिडीओमध्ये ट्रेन रवाना होताना रेल्वेमंत्री 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' अशा घोषणा देताना दिसत आहेत. तसेच, लोकांचे आभार मानताना दिसत आहेत.
Up-line train movement also started. pic.twitter.com/JQnd7yUuEB
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 4, 2023
दरम्यान, कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाईनमध्ये गेल्यामुळे तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. त्यानंतर कोरोमंडलवर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाऊन धडकली. या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक अपघात असल्याचं बोललं जात आहे.
विरोधकांचं टीकास्त्र
विरोधकांनी या घटनेवर टीका करत सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. तसेच या रेल्वेमध्ये कवच या सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आला नव्हता. तसेच या रेल्वेमध्ये अपघात थांबवणारी प्रणालीच नव्हती, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर या मार्गावर कवच ही प्रणाली उपलब्ध नव्हती, असे भारतीय रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.
पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे नेतृत्व करणारे सुधांशू मणी यांनी या दुर्घटनेत सहभागी असलेल्या दोन लोको पायलटची कोणतीही चूक नसल्याचं म्हटलं. फेब्रुवारीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये दोन मालगांड्यांमध्ये झालेल्या अपघातावेळी रेल्वेने लोको पायलटवर कारवाई केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























