एक्स्प्लोर
चारशे वर्षांनी शापमुक्ती, वाडियार राजघराण्यात पाळणा हलला
म्हैसूर राजघराण्यात कधीही मुलाचा जन्म होणार नाही आणि हा राजवंश नष्ट होईल, असा शाप या घराण्याला मिळाल्याची आख्यायिका आहे

म्हैसूर : म्हैसूरच्या वाडियार राजघराण्यात राजपुत्राच्या जन्मामुळे आनंदाचं वातावरणं आहे. तब्बल चारशे वर्षांनंतर या राजघराण्यात पाळणा हलला. त्यामुळे वाडियार राजघराण्याची शापातून मुक्तता झाल्याचं म्हटलं जात आहे. राजा यदुवीर आणि त्रिशिका यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.
म्हैसूर राजघराण्यात कधीही मुलाचा जन्म होणार नाही आणि हा राजवंश नष्ट होईल, असा शाप या घराण्याला मिळाल्याची आख्यायिका आहे. त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्यात आनंदी आनंद आहे.
दत्तक वारसाची परंपरा
वाडियार राजघराण्याचा वारस हा दत्तक घेण्याची परंपरा आहे. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांना संतती नसल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांनी राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना दत्तक घेतलं होतं.
गेल्या वर्षी राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांचा विवाह राजस्थानमधील डूंगपूरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत झाला. ऐतिहासिक आंबा विला पॅलेसमध्ये या दोघांचा विवाह जूनमध्ये पार पडला.
यदुवीर यांनी बोस्टनमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. तर त्रिशिका यांनी अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतलं आहे.
कोणी शाप दिल्याची आख्यायिका ?
1612 मध्ये विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यानंतर अलमेलम्मा यांनी या घराण्याला शाप दिला होता. विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यानंतर म्हैसूर राजघराण्याच्या सैनिकांनी विजयनगर साम्राज्याचा खजिना लुटला. त्यानंतरही राणी अलमेलम्माजवळ शाही घराण्याचे दागदागिने शिल्लक होते.
जेव्हा वाडियार राजांनी ते दागिने वाडियार घराण्याला देण्याचा आदेश राणीला दिला, तेव्हा त्यांनी नकार दिला. मात्र बळजबरीने शाही सैन्यानं राणीकडून दागिने घेण्याच्या प्रयत्न केला.
अखेर राणी अलमेलम्मा यांनी उंच डोंगरावर धाव घेतली आणि वाडियार घराण्याला तीन शाप दिले. 'तालाकडूचा वाळवंट होईल, मलंगीला पाण्याचा भोवरा गिळंकृत करेल, आणि म्हैसूरच्या राजाला कधीही अपत्य प्राप्त होणार नाही' असा शाप देऊन राणी अलमेलम्मा यांनी कावेरी नदीत उडी घेतली.
या शापामुळेच राजघराण्यात मुलाचा जन्म झाला नसल्याचं मानलं जातं. राजघराण्याचा वारस दत्तक घेण्याची प्रथा वाडियारमध्ये रुढ झाली. आता चिमुकल्याच्या आगमनानं हे घराणं शापमुक्त झालं आहे, त्यामुळे म्हैसूरच्या महालात आनंदोत्सव सुरु आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















