एक्स्प्लोर
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या महाबैठकीत नेमकं काय झालं?
शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय करता येईल यावर 7 सूत्री अजेंडा तयार करण्यासाठी ही महाबैठक होती.

फोटो सौजन्य : पीआयबी
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तज्ज्ञांनी ज्या सूचना सुचवल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 250 तज्ज्ञांसोबत काल महामंथन केलं. कृषी संशोधक, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून बोलावलेले काही महत्वाचे शेतकरी अशा सर्वांचा यात समावेश होता.
शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय करता येईल यावर 7 सूत्री अजेंडा तयार करण्यासाठी ही महाबैठक होती. प्रत्येक टीमला एक विषय दिला होता आणि त्यावर देशातल्या तज्ज्ञांशी चर्चा करुन त्यांनी महिनाभरात सूचना करायच्या होत्या.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीची बैठक बोलावली गेल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. या बैठकीतून ज्या सूचना समोर आलेल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, नीती आयोगाने आता या अभ्यासातून समोर आलेल्या गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, असं मोदींनी म्हटलं.
महाराष्ट्रातून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीही पंतप्रधानांसमोर प्रझेंटेशन केलं. महाराष्ट्रातली बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. पशुधनाशिवाय सेंद्रिय शेती करणं हे शक्य नाही. त्यामुळे पशुधन वाढवण्यावर सरकारने भर द्यावा. ज्वारी, बाजरी यावर औद्योगिक प्रक्रिया करणारे उद्योग तयार व्हावेत, अशी सूचना यावेळी त्यांनी केली.
परदेशात जे भारतीय दूतावास आहेत, त्या प्रत्येक दूतावासात एक शेतीतज्ज्ञ नेमावा, जेणेकरुन त्या देशात भारतीय शेतमालाला कसा वाव मिळेल, या दृष्टीने काम करता येईल असंही पाशा पटेल यांनी पंतप्रधानांना सुचवलं.
दरम्यान एबीपी माझाशी बोलताना सरकार इतक्या गोष्टी करत असूनही महाराष्ट्रात आणि देशात सरकारची शेतकरीविरोधी प्रतिमा का बनत चालली आहे, या प्रश्नावर पाशा पटेल यांनी राजकीय उत्तर न देता हमीभावाच्या बाबतीत उलट सरकार अगदी धडाडीने धोरणं आखत असल्याचा दावा केला.
शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अशोक दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या रिपोर्टवर शिक्कामोर्तब करण्याचं कामच कालच्या बैठकीतून झालं आहे. रोडमॅप आखला गेलाय आणि 2022 पर्यंत शेतळऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याचं लक्ष्य नक्की गाठू, असा विश्वास पाशा पटेल यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या या बैठकीला महाराष्ट्रातले जे अनेक लोक उपस्थित होते, त्यापैकी डॉ भगवान कापसे, उदय देवळाणकर यांच्यासह राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी एबीपी माझाने खास बातचीत केली आणि बैठकीतील मुद्दे जाणून घेतले.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement





















