Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात पाच पेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई; प्रशासनाने काढले आदेश
Hingoli News : विनापरवानगी पाच पेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी जमा होता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात रविवार (21 मे) रोजी पासून तर 4 जून पर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. तर अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे यांनी याबाबत पत्र काढले आहेत. सद्या ग्रामपंचायत आचारसंहिता सुरु असून, आगामी काळातील सणासुदीचे काळ आणि राजकीय घडामोडी पाहता जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे विनापरवानगी पाच पेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी जमा होता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे की, जिल्ह्यात मकर संक्राती सण तसेच 24 मे पर्यंत थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पोट निवडणुकीची आचारसंहिता आहे. 22 मे रोजी महाराणा प्रताप जयंती (तिथीप्रमाणे) आहे. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आहे. 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर जयंती आहे. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या विविध ठिकाणच्या यात्रा, सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या विविध मागण्या संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे, निदर्शने, विविध प्रकारची आंदोलने करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 21 मे रोजी संध्याकाळी 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 04 जून रोजी रात्रीचे 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे.
यांना असणार सूट...
मात्र हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Hingoli News : वडिलांचे हातपाय बांधून मुलाकडून आईवर अत्याचार; हिंगोलीत नात्याला काळीमा फासणारी घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
