![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Heat Wave : मराठवाडा तापतोय! उन्हाचे चटके अन् उकाड्यातही वाढ; अशी घ्या काळजी
Heat Wave : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे.
![Heat Wave : मराठवाडा तापतोय! उन्हाचे चटके अन् उकाड्यातही वाढ; अशी घ्या काळजी maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar Heat is increasing in Marathwada Citizens should be careful Heat Wave : मराठवाडा तापतोय! उन्हाचे चटके अन् उकाड्यातही वाढ; अशी घ्या काळजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/9791d0e8e19f0f57d09aaaf0047b5d031681891497518486_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Heat Wave : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून, दुपारच्यावेळी घराबाहेर पडणं अवघड होत आहे. दरम्यान मराठवाड्यात (Marathwada) देखील तापमानाचा पारा चढत असून उन्हाचे चटके जाणवत आहेत. विशेष म्हणजे सायंकाळनंतर उकाडा त्रस्त करून सोडत असून, भर दुपारी रस्ते, बाजारपेठांतील वर्दळ कमी होऊ लागली आहे. दुपारी प्रचंड ऊन पडत असल्याने नागरिक घरातच आराम करताना पाहायाला मिळत आहे. दरम्यान आज दुपारी 1. 20 वाजता परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पारा 39 अंश सेल्सिअसवर होता. तर छत्रपती संभाजीनगर 37, बीड 38, लातूर 38, जालना 38 आणि धाराशिव जिल्ह्यातील पारा 37 अंश सेल्सिअसवर होते.
मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाने मुक्काम ठोकल्यासारखी परिस्थिती आहे. त्यातच अनेक भागात गारपीटही होताना पाहायला मिळत आहे. असे असताना मात्र गेल्या आठवड्यापासून सूर्य तळपू लागला आहे. कमाल तापमान वाढीत मराठवाड्यात परभणी आघाडीवर आहे. तेथील पारा मंगळवारी 41.7 अंश सेल्सिअसवर होता, तर आज दुपारी 1.20 वाजता 39 अंश सेल्सिअसवर होता. तर इतर जिल्ह्यांचा देखील तापमान पारा चाळीशीच्या आसपास आहे.
उन्हात अशी घ्या काळजी! (प्रशासनाचे आवाहन)
- पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
- घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
- दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
- सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
- हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- उन्हात काम करत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी. कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
- अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत
- असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
- गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
- तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा.
- तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
- सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
- पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
- गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
इतर महत्वाच्या बातम्या:
Heat Wave : उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा कृती आराखडा, काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)