Sumeet Raghavan On Student Protest: 'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Sumeet Raghavan On Student Protest: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. पोलिसांच्या कारवाईवर आता मनोरंजन विश्वातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sumeet Raghavan On Student Protest: नीट पेपरफुटी विरोधात (NEET Paper Leak Case) देशभरातली विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी एल्गार पुकारला असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या (Union Education Minister Dharmendra Pradhan) मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janata Party) 20 जुलै रोजी संसद मोर्चाची हाक दिलेली. पण, संसदेच्या दिशेनं निघालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. निर्दयीपणे विद्यार्थ्यांची डोकी फोडण्यात आलीत, कित्येक विद्यार्थी रक्तबंबाळ झालेले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. पोलिसांच्या कारवाईवर आता मनोरंजन विश्वातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक सेलिब्रिटी विद्यार्थ्यांसाठी एकवटले आहेत. अशातच आता मराठमोळा अभिनेता सुमित राघवन (Marathi Actor Sumeet Raghavan) यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा मोठा निषेध व्यक्त केला आहे. तसेच, विद्यार्थ्यांचं कौतुकही केलंय.
अभिनेता सुमित राघवन काय म्हणाला? (Sumeet Raghavan On CJP Students Protest)
अभिनेता सुमित राघवन म्हणाला की, "प्रश्न विचारू नका... जे चाललंय ते चांगलंच चाललंय... प्रश्न विचारले की, देशाचं नाव खराब होतं. आमच्या महाराष्ट्रातही पाहिलं, प्रश्न विचारला की, महाराष्ट्राचा अपमान होतो. पण एखाद्या राजकीय नेत्याच्या गुंडांनी डॉक्टरांना बेदम मारलं, पूल कोसळले, पूरस्थितीत लोकांना तीन-तीन दिवस वीज मिळाली नाही, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही..."
पुढे बोलताना सुमित राघवन म्हणाला की, "प्रश्न विचारले की, हात उचलला जातो. सोशल मीडियावर सगळीकडे तेच दिसत आहे. ही लोकशाही आहे की नाही? त्या मुलांची चूक तरी काय आहे? हे सगळं संवादातून सोडवता आलं असतं. प्रशासनाला आधीच कल्पना होती, मग विद्यार्थ्यांशी चर्चा का झाली नाही? मुलांना किती मारलंय. ही मुलं कोण आहेत? आपल्या देशाचीच आहेत ना? महाराष्ट्रातील एका नेत्यानं मुलांचा उल्लेख दहशतवादी असा केला..."
View this post on Instagram
"ही मुलं दहशतवादी नाहीत, ही आपल्या देशाचं भविष्य आहेत. कृपया तुमच्या खुर्चीवरून उठा, विद्यार्थ्यांशी संवाद साधा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा, त्यांना आत्मविश्वास द्या. घरातील मोठी माणसं जशी मुलांशी प्रेमाने बोलतात, तसंच त्यांच्याशीही बोला", असं आवाहन सुमित राघवननं सरकारला केलंय.
"या मुलांना माझा सलाम. किती ताकद आहे त्यांच्यात... मी खूप मोठा कलाकार नाही, एक सामान्य नागरिक आहे. पण मी तुमच्या सोबत आहे. जय हिंद!", असं म्हणत सुमित राघवननं आंदोलनात उतरलेल्या मुलांचं कौतुकही केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















