Car Accident : मुंबई-नाशिक हायवेवर प्राजक्त देशमुखच्या गाडीचा अपघात; थोडक्यात अनर्थ टळला
Nashik-Mumbai Highway : मुंबईहून नाशिकला जाताना एका अवजड वाहनाच्या बेशिस्तपणामुळे प्राजक्त देशमुखच्या कारचा अपघात झाला आहे. यावेळी त्याने वाहतूक विभागावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं आहे.
Nashik-Mumbai Highway : 'देवबाभळी' सारखं नाटक आणि 'गोदावरी' सारख्या चित्रपटाचं संवाद लेखन करणारा प्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) याच्या गाडीला मुंबई-नाशिक हायवेवर अपघात झाला आहे. मुंबईहून नाशिकला जाताना एका अवजड वाहनाच्या बेशिस्तपणामुळे हा अपघात झाला असल्याचे प्राजक्तने ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
प्राजक्त देशमुख ट्वीट करत म्हणाला की, "नाशिक मुंबई हायवेवरुन धावणारी अवजड वाहनं बेशिस्तीने ये-जा करतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेंटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे. परंतु या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पीडगन लावून दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम? असा सवालही प्राजक्त देशमुखने उपस्थित केला आहे. तसेच, अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असताना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा."
नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?१/ज्ञ pic.twitter.com/uaJSasmXey
— Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख (@Prajaktdeshmukh) February 3, 2023
मुंबई-नाशिक महामार्गावर याआधीही अनेक अपघात
मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. तसेच, वाहतुकीचे नियम अधिक कडक करुन वाहनांच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे.
प्राजक्त देशमुखविषयी थोडक्यात...
प्राजक्त देशमुख हे एक मराठी लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि कवी आहेत. प्राजक्त देशमुख याच्या 2017 मध्ये आलेल्या ‘देवबाभळी’ या नाटकाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (SCO) 14 सिनेमांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गोदावरी या सिनेमाची निवड करण्यात आली. या सिनेमाचं संवाद लेखन प्राजक्त देशमुख याने केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Nashik News : मालेगाव टोकडे रस्ता चोरी प्रकरणाला नवे वळण, शेतकऱ्यांनी मागितली 50 लाख रुपये भरपाई