Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांचा महात्मा फुले समता पुरस्कारने गौरव करण्यात येणार आहे.
![Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव Nagraj Manjule Marathi actor Director will be honored with the Mahatma Phule Samata Award Entertainment Marathi news Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/49599c3e55f91d76b6ac09ca65e2098a1732609160509720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagraj Manjule : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे नाव मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत अग्रक्रमाने घेतल जाते. नागराज मंजुळे हे एक दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, पटकथा लेखक, कवी आहेत, ज्यांनी एकापेक्षा एक कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीला दिल्या आहेत.
त्यांना वास्तववादी लेखन, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. आजवर त्यांना अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी आपल्या कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन 2024 चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.
येत्या 28 नोव्हेंबर रोजी फुले वाड्यात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार देण्यात येतो.
याआधी हा पुरस्कार र माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कै.प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)