Farmers Protest | 'तेव्हा अनुपम खेर टिव टिव का करत नाही?', महेश टिळेकर यांचा सवाल
विदेशी सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप न करण्याचा सल्ला अनुपम खेर यांनी दिला. त्यानंतर "अनुपम खेर अब तेरी खैर नही" असं म्हणत महेश टिळेकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला. आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती जेव्हा इतर देशातील एखाद्या घटनेबद्दल ट्वीट करुन मत व्यक्त करते तेव्हा अनुपम खेर ते वाचून का नाही टिव टिव करत? असा प्रश्नही टिळेकर यांनी विचारला.
मुंबई : दिल्लीच्या सीमांवर मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहाना, सामाजसेविका ग्रेटा थर्नबर्र, मिया खलिफा यांनी भाष्य केलं. त्यानंतर बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक खुपसू नये, असं म्हणत देशभरातील खेळाडू, बॉलिवूड अभिनेत्यांनी ट्वीट केले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचाही समावेश आहे. परंतु मराठी सिनेसृष्टीतील निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अनुपम खेर यांच्यावर संताप व्यक्त केला. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून खेर यांच्यावर हल्लाबोल केला आहे आहे.
विदेशी सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप न करण्याचा सल्ला अनुपम खेर यांनी दिला. याबाबत त्यांनी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आमच्या देशाच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या काही परदेशींसाठी हा शेर. रिंदे ख़राब हाल को ज़ाहिद ना छेड तू , तुझको परायी क्या पड़ी अपनी नबेड तू.. :)"
हमारे देश के अंदरूनी मामलों में दख़ल देने वाले कुछ विदेशियों के लिए यह शेर अर्ज़ है... रिंदे ख़राब हाल को ज़ाहिद ना छेड तू , तुझको परायी क्या पड़ी अपनी नबेड तू.. :)#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Anupam Kher (@AnupamPKher) February 3, 2021
अनुपम खेर यांच्या या ट्वीटनंतर महेश टिळेकर चांगलेच खवळले. "अनुपम खेर अब तेरी खैर नही" अशा मथळ्याखाली त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला. "शेतकरी आंदोलनाबाबत इतर देशातील कलाकारांनी ट्वीट केलं म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती जेव्हा इतर देशातील एखाद्या घटनेबद्दल ट्वीट करुन मत व्यक्त करते तेव्हा अनुपम खेर ते वाचून का नाही टिव टिव करत?" असा सवाल त्यांनी विचारला. तसंच "अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून किती ..... आहे ते आता चांगलंच समजलं" असंही ते म्हणाले
काय लिहिलंय महेश टिळेकर यांनी?
अनुपम खेर अब तेरी खैर नही सिनेसृष्टीतील मुखवट्या मागचे खरे चेहरे आणि खायचे दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही. संधी साधू असणारे आणि लोकांच्या प्रेमामुळे मोठे झालेल्या काही कलाकारांचे खरे रूप वेळोवेळी माझ्या पाहण्यात आले आहे. लोकांचं प्रेम मिळून लोकप्रिय यशस्वी झालेल्या या काही कलाकारांची अवस्था आपल्या राष्ट्रीय पक्षी मोरासारखी असते. मोराला आपल्या पिसाऱ्यावर गर्व असतो, तो पिसारा फुलवून दाखवला की पाहणाऱ्यांच्या कडून कौतुक होते, वाहवा मिळते, म्हणून मोर खुश असतो. पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग (मागचा भाग) हा मात्र उघडा असतो हे सत्य आहे. काहीशी अशी अवस्था अनुपम खेर या नटाची आहे असं मला वाटतं. अर्थात अभिनेता म्हणून तो ग्रेटच आहे.
हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला ते निळूभाऊ फुले यांच्या एका भेटीनंतर. निळू फुले यांनी अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेल्या सारांश या हिंदी सिनेमात काम केले होते. सारांश सिनेमाला 25 वर्ष झाली म्हणून एका कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते त्यासाठी निमंत्रण द्यायला अनुपम खेर पुण्यात निळू फुले यांना भेटले. त्यावेळी एका मोठ्या आजारामुळे निळू भाऊंची प्रकृती उत्तम नसल्यामुळे आणि शरीर साथ देत नसल्यामुळे ते घराबाहेर पडत नसत की कोणाला फारसे भेटत ही नव्हते. अनुपम खेर यांनी निळू भाऊंना भेटून काढलेले फोटो आणि बातम्या जेव्हां मुंबईच्या काही पेपरमध्ये आल्या त्या वाचून अनुपम खेरने तापलेल्या तव्यावर किती भाकऱ्या भाजल्या ते समजले. फिल्म इंडस्ट्रीपासून अज्ञातवासात गेलेल्या ज्येष्ठ कलाकार निळू फुले यांना अनुपम खेरने शोधून काढले अश्या आशयाच्या बातम्या आणि त्यात अनुपम खेर यांनी किती कसे कष्ट घेतले निळुभाऊंना शोधायला त्याचे रसभरुन वर्णन होते.
अण्णा हजारे यांच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला अनुपम खेर स्टेजवर जाऊन भाषण ठोकताना पाहून हा किती मोठा कल्लाकार आहे ते समजलं. तिथे जमलेला अफाट जनसमुदाय, प्रेस मीडिया यांच्या समोर स्वतःची लाल करुन अण्णा हजारेबद्दल कळवळा दाखवणारा हा संवेदनशील कलाकार, दिल्लीत शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला किंवा साधं भेटायला जाण्याचं धाडस का दाखवत नाही? का तो आता एका पक्षाचा कुणीतरी आहे म्हणून सोयीप्रमाणे भूमिका बदलली याने? अण्णा हजारे यांना दिल्लीत जाऊन पाठिंबा देताना देशभरात अण्णांची हवा होती पण हीच हवा कालांतराने निघून गेल्यावर अनुपम खेर नंतर कधी अण्णांच्या वाऱ्याला ही उभा राहिला नाही की त्यांची भेट घ्यायला राळेगणसिद्धी गावी गेल्याचे ऐकीवात नाही.
आता मात्र शेतकरी आंदोलनाच्या धगधगत्या आगीवर इतर देशातील कलाकारांनी ट्वीट केलं म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती जेव्हा इतर देशातील एखाद्या घटनेबद्दल ट्वीट करुन मत व्यक्त करते तेव्हा अनुपम खेर ते वाचून का नाही टिव टिव करत?🤔
अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून किती ..... आहे ते आता चांगलंच समजलं 👍 महेश टिळेकर निर्माता दिग्दर्शक
अनुपम खेर अब तेरी खैर नही सिनेसृष्टीतील मुखवट्या मागचे खरे चेहरे आणि खायचे दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या...
Posted by Mahesh Tilekar on Wednesday, 3 February 2021
संबंधित बातम्या