सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद; ठाकरे बंधूंच्या एकीवर साहित्यिक अरविंद जगताप यांची पोस्ट
Arvind Jagtap Post on Raj Thackeray Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर साहित्यिक अरविंद जगताप यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

Arvind Jagtap Post on Raj Thackeray Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी (5 जुलै) रोजी 20 वर्षांनी एकत्र आलेले पाहायला मिळाले. दोन्ही नेते मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले. विशेष म्हणजे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी यावेळी विजयी सभा घेतली. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, असं कित्येक लोकांनी यापूर्वी देखील बोलून दाखवलं होतं. हा क्षण पाहाण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला 20 वर्षे वाट पाहावी लागली. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर साहित्यिक अरविंद जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद जगताप त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात, भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो. भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो. भाऊ एक झाले की शहराला बळ येतं . गावाला तर येणारच. एक व्हायचं. गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा.
भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो .
— Arvind Jagtap (@arvindj3) July 5, 2025
भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो.
भाऊ एक झाले की शहराला बळ येतं . गावाला तर येणारच. एक व्हायचं.
गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा.
महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शिक्षणात सुरुवातीला हिंदी भाषा सक्ती केली होती. मात्र, चारीबाजूंनी विरोध झाल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर सरकारने सक्तीच्या जागी तिसरी भाषा शिकवण्याचा आग्रह धरण्यास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षणात मराठी, इंग्रजी आणि नंतर कोणतीही तिसरी भाषा शिकवली जावी, असा अट्टाहास शासनाने केला होता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या शासन निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील सरकारच्या या निर्णयास विरोध करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोध डावलून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा विचार ठेवल्यानंतर राज ठाकरेंनी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चात एकत्र येणार हे देखील ठरलं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा घुसडण्याचा निर्णय मागे घेतला. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर मोर्चा ऐवजी विजयी सभा घेण्याचं ठरलं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेले पाहायला मिळाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























