Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
Satara ZP Election : सातारा जिल्ह्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना रांजणे यांचा पराभव झाला आहे. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या त्या पत्नी आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. या जिल्हा परिषद गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा करिश्मा पाहायला मिळाला. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नीचा पराभव होणं धक्कादायक मानलं जात आहे.
कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना रांजणे यांचा पराभव
सातारा जावळीचे आमदार मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का बसला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. या गटात शिवसेनेच्या कविता ओंबळे या विजयी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा करिश्मा पाहायला मिळाला.
शशिकांत शिंदे यांच्याकडून जिल्हा बँकेच्या पराभवाची परतफेड
ज्ञानदेव रांजणे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि शशिकांत शिंदे यांनी एकत्र यात कविता ओंबळे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत कुसुंबी गटातून भाजपला धक्का बसला आहे. ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे.
जयकुमार गोरे यांना दोन धक्के
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दोन धक्के बसले आहेत. जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. औंध गटात देखील मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झाला आहे. औंध जिल्हा परिषद गटात मनिषा फडतरे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्या आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे भाजप आंधळी गटातून विजयी झाल्या आहेत. विक्रमी 18 हजार मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला. सोनल गोरे यांच्या उमेदवारीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा तीव्र विरोध होता, अशी माहिती आहे.
शंभूराज देसाईंनी पाटणचा गड राखला
जयकुमार गोरे यांनी पाटणमध्ये आक्रमक प्रचार केला होता. शंभूराज देसाई यांनी मात्र पाटण पंचायत समितीत सत्तांतर घडवून आणलं आहे. पाटणचा बालेकिल्ला शंभूराज देसाई यांनी राखला आहे.




















