संतोष देशमुखांना खोट्या अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन कसा रचला?; बैठकीत उपस्थित असलेल्या व्यक्तीनेच सांगितला, गोपनीय साक्ष समोर!
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींना केला होता. या सगळ्या प्रकरणात एक गोपनीय साक्षीदाराने ही साक्ष दिली आहे.

Santosh Deshmukh Murder Case बीड: बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींना केला होता, असं धनंजय देशमुख गेल्या काही दिवसांपासून सांगत आहेत. दोन दिवसापूर्वी कळंबमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि हीच तीच महिला खोटी तक्रार देणार होती असंही बोललं गेलं. याबाबत आता एबीपी माझाच्या हाती गोपनीय साक्षीदाराची साक्ष मिळाली आहे.
संतोष देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींना केला होता. या सगळ्या प्रकरणात एक गोपनीय साक्षीदाराने ही साक्ष दिली आहे. हा साक्षीदार ज्या बैठकीत हा प्लॅन ठरला होता त्या बैठकीत उपस्थित होता. तसेच हा प्लॅन विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याकडून करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. विष्णू चाटेला सुदर्शन घुलेने सांगितलं होतं. आम्ही सरपंच संतोष देशमुखांना उचलून नेतो आणि तक्रार करायला गेला, तर त्याच्याविरोधात 376 चा गुन्हा दाखल करतो, असं गोपनीय साक्षीदाराने आपल्या साक्षीत म्हटलं आहे. दरम्यान, देशमुख हत्येनंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेच्या हत्येला कारणीभूत कोण? असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे. तर पोलिसांनी संतोष देशमुख हत्येनंतरच्या घटना गांभीर्याने घेतल्या नाहीत, असा आरोपही धनंजय देशमुख यांनी केला आहे.
अंजली दमानियांचा धक्कादायक आरोप-
संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध होते असं भासवण्यासाठी एका महिलेचा वापर झाल्याचा आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला होता. त्या महिलेची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. धाराशिवमध्ये कळंबमधल्या द्वारका नगरीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झालाय. संतोष देशमुख प्रकरणी या महिलेची चौकशी झाल्याचं अंजली दमानियांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या मृत्यूची बातमी कळंब पोलिसांआधी बीड पोलिसांना मिळाली आणि यावर बोट ठेवत अंजली दमानियांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केलेत. मृतदेहाचे घटनास्थळीच पोस्टमार्टेम करून तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय.

























