गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या 26,749 उमेदवारांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली

मुंबई : एमएमआरडीए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) निघालेल्या इंजिनिअर पदांसाठीच्या परीक्षेचा (Exam) निकाल नुकताच जाहीर झाला. मात्र, या परीक्षेतील निकालानंतर उमेदवारांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. तसेच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते मेहबुब शेख यांनी देखील या निकालावर आक्षेप घेत काही नावांची यादी जाहीर केली आहे. तर, आता, MMRDA कडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. या भरती प्रक्रियेचा प्रोव्हिजनल निकाल जाहीर झाल्यानंतर, प्राधिकरणाकडे काही उमेदवारांकडून ई-मेलद्वारे तक्रारी व आक्षेप प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी 30 दिवसांच्या आत तक्रारी MMRDA कडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या नियम व प्रक्रियेनुसार 235 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या 26,749 उमेदवारांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 20,459 उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. एमएमआरडीएने यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे, सदर परीक्षा हि महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार आणि शासनमान्य TCS संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. तथापि, प्रोव्हिजनल निकालानंतर उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण व्हावे आणि भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, या उद्देशाने प्राप्त तक्रारींची स्वतंत्र उच्चस्तरीय 3 सदस्यीय समितीमार्फत पडताळणी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतल्याचे सांगण्यात आले.
उच्चस्तरीय समितीकडून चौकशी
MMRDA कडून या परीक्षेसंदर्भात स्वतंत्र उच्चस्तरीय 3 सदस्यीय समितीमार्फत पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. अनुभवी आणि वरिष्ठ पदावर काम केलेल्या व्यक्तींचा या समितीत समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष: जॉनी जोसेफ, माजी मुख्य सचिव असणार आहेत, तर सदस्य म्हणून प्रो. श्यामप्रसाद करगडे, पीएच.डी., प्राध्यापक, आयआयटी बॉम्बे आणि दासका सत्यनारायण मूर्ती, पीएच.डी., प्राध्यापक, आयआयटी बॉम्बे, असतील. त्यामुळे, भरती प्रक्रियेसंदर्भात ज्या उमेदवारांना तक्रार, आक्षेप अथवा म्हणणे मांडायचे असेल, त्यांना पुढील 30 दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी आपली तक्रार, आवश्यक पुरावे आणि संबंधित कागदपत्रांसह खालील ई-मेल आयडीवर प्राधिकरणाकडे सादर करावी. ईमेल : vacancymmrda@mailmmrda.maharashtra.gov.in
वरील मुदतीत प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी व त्यासोबत सादर केलेल्या सर्व पुराव्यांची समितीमार्फत वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी केली जाईल. प्राधिकरणाने TCS कडे या संदर्भातील खुलासाही मागविला आहे, अशी माहिती निवेदनातून देण्यात आली. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी आणि समितीला प्राप्त तक्रारींचे निष्पक्ष परीक्षण करता यावे, यासाठी समितीचे परीक्षण पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाकडुन त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील योग्य निर्णय घेण्यात येईल.
हेही वाचा
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती






















