Mumbai Crime: मोठी बातमी! म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीनं उचचलं टोकाचं पाऊल, पतीच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी जीव संपवला
Mumbai Crime: राज्यभरातून छळवणुकीवरून होणारया विवाहित महिलांच्या आत्महत्यांची प्रकरण ताजी असताना आता म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीनं टाेकाचं पाऊल उचचल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

Mumbai: मुंबईतील कांदिवलीतील आकुर्ली परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 44 वर्षीय रेणु कटरे यांनी राहत्या घरी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली असून, पैशाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. (Mumbai Crime News)
नेमकं प्रकरण काय?
रेणु कटरे या शिक्षिका होत्या आणि पती बापू कटरे यांच्यासोबत आकुर्ली येथे राहत होत्या. स्थानिक माहितीप्रमाणे, दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वारंवार वाद होत असत. शनिवारी रात्रीही असाच काहीसा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळातच रेणु यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर कटरे कुटुंबात हळहळ व्यक्त होत असली तरी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रेणु कटरे यांचे भाऊ अॅड. नितीन शेवाळ यांनी ही आत्महत्या नसून, हत्या असण्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी थेट पती बापू कटरे यांच्यावर गंभीर आरोप करत, बहिणीचा छळ केल्याचे म्हटले आहे. राज्यभरातून सध्या विवाहित महिलांचे छळवणूकीच्या कारणानं आत्महत्यांची प्रकरणं समोर येत असून म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीनं याच कारणातून टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
या संपूर्ण प्रकरणाबाबत अॅड. नितीन शेवाळ हे समतानगर पोलिस ठाण्यात पोहोचले असून, त्यांनी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, समतानगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रेणु कटरे यांच्या मृत्यूमागील कारण नेमकं काय आहे, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. मात्र, कुटुंबियांनी जो संशय व्यक्त केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
























