DA Hike : केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी
DA Hike News : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठी बातमी आहे. एनडीए सरकारनं दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली. या बैठकीत डीए आणि डीआरमध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. महागाई भत्ता वाढवण्यात आला असून तो 1 जुलै 2024 पासून लागू असेल. यामुळं लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला लाभ होणार आहे. केंद्राच्या सेवेत 49 लाख कर्मचारी आहेत तर, 60 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत.
केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. तर, निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा भत्ता जातो. सर्वसाधारणपणे डीए आणि डीआर वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. जानेवारी आणि जुलैमध्ये त्यामध्ये वाढ करण्यात येते. केंद्राच्या सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतन धारकांना 50 टक्के महागाई भत्ता मिळतोय. मार्च महिन्यात केंद्रानं 4 टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 2006 मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय सेवेतील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये सुधारणा केली होती.
केंद्र सरकारनं जुलैमध्ये निर्णय घेणं अपेक्षित असताना निर्णय न झाल्यानं विविध कर्मचारी संघटनांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं होतं. आता केंद्राच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा फरक मिळेल.
ऑक्टोबरमध्ये पगार वाढवून मिळणार
केंद्र सरकारनं आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता 3 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार वाढवून मिळेल, त्याशिवाय निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ होईल. याशिवाय जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे.
सध्या महागाई भत्ता किती टक्के मिळतो?
केंद्र सरकारकडून वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत होता. मार्च महिन्यात केंद्रानं 4 टक्के वाढ केली होती. आता 3 टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आल्यानं तो 53 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
दरवर्षी दोनदा वाढ
केंद्र सरकारकडून केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये दोनदा वाढ करण्यात येते. याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं. केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवल्यानंतर राज्य सरकारांकडून देखील त्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली जाते. केंद्राच्या निर्णयानंतर इतर कोणती राज्य असा निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या























