आपण 'सोडून द्यायला' कधी शिकणार?

आपण सोडून द्यायला कधी शिकणार? या शीर्षकातला हा प्रश्न खरं तर मी स्वत:ला विचारतोय आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक अनुभव येत असतात. आनंददायी, दु:खदायी, वेदनादायी, काही बोच देणारे तर काही मन दुखावणारेही असतात. यामध्ये काही पराकोटीचा राग आणणारे असतात तर, काहीवेळा आपण उगाचच एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करतो किंवा मनाला लावून घेतो, म्हणूनही आपल्याला येत असतात. म्हणूनच हास्यजत्रामधील समीर चौघुलेंच्या लोचन मजनू कॅरेक्टरच्या भाषेत सांगायचं झालं तर राहून राहून यही प्रश्न उरताहै रसिकहो...क्या है...गुस्सा? आणि त्यात अॅड करावंसं वाटतं क्यूँ है यह गुस्सा ? अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर आपण कधी कधी हर्ट होतो, कधी ती प्रचंड मनाला लावून घेतो.
मग एखादी गोष्ट आपल्याला आधी कळली नाही म्हणून किंवा एखादी गोष्ट आपल्याला नकोय तरीही घडली म्हणून किंवा एखादी गोष्ट आपण न करण्यास सांगितल्यावरही घडली म्हणूनही राग येऊ शकतो. यामध्ये काही वेळा आपल्या मनाविरुद्ध घडल्याची सल असते तर काही वेळा आपला स्वाभिमान (की अहंकार?) दुखावल्याची रुखरूख असते. खरंच इतका ताण घ्यायची आणि द्यायचीही गरज असते का? याचं उत्तर अजिबात नाही असंच आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात आठ ते दहा तास आपण किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त तास घरापासून, कुटुंबापासून दूर असतो.या कुटुंबात आईवडील, भावंडं, बायको, मुलं सारेच असतात. ही आपली सपोर्ट सिस्टीम असते. ती आपल्याला कधी कधी आठवड्यात काही वेळ किंवा काही मिनिटंच भेटत असते. म्हणजे सकाळी ८.३० ला स्कूलबस येणाऱ्या मुलांचे सेकंड शिफ्ट करणारे आईवडील त्यांना दिवसाला फक्त ४५ मिनिटं भेटतात. सकाळी साडेसातला तुम्ही उठलात की मुलांची शाळेची तयारी. मुलांची ८.१५ ते ८.३० दरम्यान स्कूल बस येते. मग मुलं शाळेमध्ये. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी जेव्हा ही बच्चेकंपनी घरी परतते तेव्हा तुम्ही ऑफिसकडे निघालेले असता. रात्री १२ नंतर तुम्ही घरी परतता तेव्हा मुलं गाढ झोपलेली.
ही झाली मुलांबद्दलची कथा तर दुसरीकडे तळहाताच्या फोडांप्रमाणे आपल्याला जपणाऱ्या आईवडीलांनाही त्यांच्या उतारवयात आपण हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. आपल्या मुलांना काय किंवा आईवडिलांना काय इतकंच काय नवरा-बायकोही एकमेकांना पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाहीत. ही जरी आपली अपरिहार्यता असली तरी म्हणूनच जेवढा वेळ आपल्याला कुटुंबासोबत आपल्या माणसांसोबत मिळतो, तो क्वालिटी टाईम आपण खरंच प्रत्येक मिनिट भरभरून जगून केला पाहिजे. त्यातही एकमेकांच्या कुरबुरी काढणं, तू असंच बोललास, ती असंच म्हणाली, हे टाळायला हवं. त्याच वेळी भूतकाळात घडलेल्या काही जखमांच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढून आपण वर्तमान आणि कदाचित भविष्यावरही का घाव घालायचा बरं? आपला अहंकार, स्वाभिमान इतका टोकदार झालाय की, आपल्याला लगेच राग येतो. हे टाळलंच पाहिजे.
मुलं काय किंवा आईवडील काय....किंवा अगदी नवरा-बायको काय...सर्वच नात्यात एकमेकांकडून हवे असतात दोन आपुलकीचे शब्द. तेव्हाही जर तुम्ही एकमेकांची किंवा बाहेरच्या कुणाची तरी उणीधुणी काढून त्यावर चर्चा किंवा वाद घालत बसलात तर तुमच्या हक्काचा क्वालिटी टाईम तुम्हीच नासवताय. वेळ ही कापरासारखी असते. निसटून जाते. भुर्ऱकन उडून जाते. त्यात मोबाईल नावाच्या यांत्रिक सदस्याची कुटुंबात केव्हा एन्ट्री झाली आणि केव्हा तो फॅमिलीतला एक होऊन केला ते कळलंही नाहीये. या मोबाईलवरही दिवसातला आपला बराच वेळ जातो. म्हणजे कामाबद्दलचे ग्रुप्स आणि मेसेजेस बाजूला ठेवले तरी आपला दिवसाचा स्क्रीन टाईम किती असावा, याचाही आपण विचार कळण्याची वेळ आलीय. या मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे, मेंदूवर होणारे परिणाम, मानसिक आरोग्यावर होणारे आघात याबद्दल तज्ज्ञ नेहमीच पोटतिडकीने सांगत असतात. या मोबाईलमुळेच जग जवळ आलंय. पण,माणसं लांब जातायत का? प्रत्यक्ष संवादाचं नेटवर्क तुटत चाललंय का? आपण स्वत:ला तटस्थपणे प्रश्न करायला हवेत. म्हणून म्हणतो, आपण झालं गेलं सोडून द्यायला हवं. एकमेकांशी बोलताना प्रत्येकानेच भान ठेवायला हवं. प्रत्येकाचा मान राखायला हवा, हे जरी खरं असलं तरीही तीच तीच गोष्ट मग अगदी १०-१२ वर्षांपूर्वी घडलेली असली तरी तुम्ही उगाळत बसलात तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही गमावून बसता. घरचं वातावरण कलुषित होतं. आयुष्य हातून निसटायला लागतं. त्यापेक्षा 'शो मस्ट गो ऑन' या बाण्याने पुढे जात राहावं. समोरच्याचा एखाद-दुसरा चुकीचा शब्द विसरून जावा किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं. हातात आहेत ते क्षण भरभरून जगावेत. या लेखाच्या शीर्षकातला प्रश्न मला कुणालाही विचारायचा नाहीये. आपण प्रत्येकाने स्वत:च आपल्याला विचारून पाहायचाय. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना...सांगा...कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा...
ट्रेंडिंग न्यूज






















