BLOG : आपल्या सर्वात जिवंत असलेला सदाकांत मिश्रा!

'जॉली एलएलबी'च्या क्लायमॅक्स सीनमध्ये वकील असणारा जगदीश उर्फ जॉली त्यागी एक विलक्षण प्रश्न करतो.
हिट अँड रन केसमध्ये आरोपीला वाचवण्यासाठी केस कमजोर करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला विचारतो की, तुम्ही आपल्या काळजावर हात ठेवून सांगू शकता का, 'की तुम्ही ह्या केसचे काम अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे केले आहे का?'
तपास अधिकारी सबइन्स्पेक्टर राठी म्हणतात की, 'मी अगदी प्रामाणिकपणे काम केले आहे.'
राठीच्या उत्तरानंतर ऍडव्होकेट त्यागी आपल्या हातातला कागदाचा तुकडा त्यांच्या हाती देऊन ह्या कागदाच्या चिठोऱ्यावरील यादीत ज्या लोकांची नावे दिली आहेत ती वाचा. ह्या अपघातात मरण पावलेल्या लोकांची नावे आहेत.
न्यायमूर्ती देखील सांगतात की, जरा नावं वाचून तरी पाहा.
राठी हातातल्या कागदावर लिहिलेली नावे वाचून दाखवू लागतात.
एकेक करुन ते नावं वाचून दाखवू लागतात. एका नावापाशी ऍडव्होकेट त्यागी त्यांना थांबवून म्हणतात की, जेव्हापासून मी ही केस घेतली आहे तेव्हापासून ह्यात मरण पावलेली माणसं माझ्या स्वप्नात येतात आणि सांगतात की तुम्ही तुमचं काम इमानदारीने केलेले नाही.
ह्यावर इन्स्पेक्टर राठी कुत्सितपणे हसून उद्गारतो की, 'मग ह्यातल्या एखाद्या मुडद्याला तुम्ही इथे साक्षीला का बोलवत नाही?'
त्यागी म्हणतात की, 'मी तेच करणार आहे. ह्या अपघातात जिवंत असलेल्या मात्र तुम्ही कागदोपत्री मृत दाखवलेल्या माणसाला मी बोलवलं आहे!'
लपून छपून कसेबसे कोर्टापर्यंत आलेला अपघातात पाय गमावून बसलेला सदाकांत मिश्रा हातातल्या बैसाखीच्या सहाय्याने लंगडत लंगडतच कोर्टातल्या विटनेस बॉक्समध्ये येतो आणि पुढे काय होते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे.
हे सर्व इथे लिहायचे कारण म्हणजे, अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नुकतेच नियुक्त झालेल्या तुकाराम मुंढे यांनी मागील काही दिवसांत जी धडक कारवाई हाती घेतली आहे, ज्या धाडी घातल्या जात आहेत ते सर्व थक्क करणारे आणि आपल्या हतबलतेविषयी तिडीक आणणारे आहे!
दूध, लस्सी, खवा, मिठाई, फळे, भाजीपाला, डाळी, धान्ये काहीही भेसळीशिवाय आपल्या पर्यंत पोहोचत नव्हते आणि आजही पोहोचत नाही हे स्पष्ट झालेय.
बनावट औषधे, बनावट दूध, बनावट, खाद्य पदार्थ हे सारं आपण बिनदिक्कत वापरत होतो, डोळे झाकून खात होतो.
हे सर्व जिवघेणं आणि आपल्या विश्वासाला तडा देणारं आहे हे काही विशिष्ठ लोकांना माहिती होतं. तरीही ते हे करत होते आणि जे ह्यात सक्रिय सहभागी नव्हते ते ह्यांना संरक्षण देत होते;
हे सर्व घडतेय हे सरकारमधील बाशिंद्यांनाही ठाऊक होतं, ह्या सर्वांना मलिदा मिळत होता. आपण मात्र विष खात होतो, जहर पित होतो. अद्यापही आपण विष खातो आहोत.
आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनाही हे ठाऊक होतं, जे सरकारी सेवेत राहून कर्तव्यात कसूर करून पैशाच्या हव्यासापायी डोळे मिटून होते. जे ह्या धंद्यात रुतले होते ते आपल्या घासात जहर कालवत होते!
किती मोठी घोर फसवणूक हे लोक करत होते आणि आपण ह्यांच्यावर भरवासा ठेवून होतो! आपण किती हतबल झालो आहोत हे आता कळतेय!
मधल्या काळात अन्न भेसळीने अनेकांच्या शरीरात व्याधी निर्माण झाल्या, काहींना कॅन्सरसारखे आजार झाले. काहींचे अवयव बाद झाले, काहींची दृष्टी गेली तर काहींच्या शरीरावरचे नियंत्रण गेले, अनेकांना मधुमेह रक्तदाबाने ग्रासले!
आणि ह्यावर जी औषधे घेतली जात होती त्यातदेखील सरमिसळ होत होती हे आता समोर येतेय! ह्या सर्व हाराकिरीपायी जी माणसं जीव गमावून बसली, जी अधू झाली, जी खचून गेली ती सर्व माणसं आता आपल्या[पैकी अनेकांच्या समोर तरळत असतील!
काय दोष होता ह्या लोकांचा?
ही सर्व दिवंगत माणसं आणि आता हयात असणारी हतबल माणसं एकच प्रश्न विचारत आहेत आणि तो म्हणजे सरकारमधील मंत्र्यांसह, सचिवासह, संबंधित खात्यातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह ह्या सर्व लोकांनी आपलं काम नीट प्रामाणिकपणे केलेलं नाही. त्यांनी असं का केलं?
त्यांनी आपल्याला फसवलं आहे. जे काम मुंढे करत आहेत ते काम आधी का केलं गेलं नाही? का गप्प होते हे लोक? आता ह्याची फिर्याद कुणाकडे करायची? आपलं जे अंतर्बाह्य नुकसान झाले आहे त्याची भरपाई कशी होणार?
आपण सारेच, सदाकांत मिश्रा आहोत, मात्र जॉली एलएलबी मधला सदाकांत आणि आपण ह्यात एक फरक आहे!
'जॉली'मधला सदाकांत कागदोपत्री मरण पावलेला होता. आपण मात्र कागदोपत्री जिवंत आहोत मात्र प्रत्यक्षात आपण सारी कलेवरे आहोत, ज्यांना आवाज नाही, ज्यांचा आक्रोश मौनाच्या कुपीत कैद आहे!
बस्स! मला आणखी काहीच सांगायचं नाही...
ट्रेंडिंग न्यूज






















