BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''

मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड फारसे वाढत नाही या उक्तीला तीने चुकीचे ठरवले, हयातभर अपार कष्ट उपसत आणि स्वर साधना करीत, दीनानाथ मंगेशकर यांच्यासारख्या आक्रमक, पल्लेदार गायकी असलेल्या गुणी आणि प्रतिभाशाली गायकापोटी जन्म घेण्याचे सौभाग्य इतर भावांडा प्रमाणेच तिला (Asha bhosle) ही लाभले, मात्र साक्षात सरस्वतीचा दैवी अंश असलेल्या "लता दीदींच्या मोठ्या झाडाच्या सावलीत राहण्याचा आणि वाढण्याचा शाप घेऊनच ती जगली, वावरली आणि यशाच्या एकेक पायऱ्या चढत स्वतःचे झाड ही तीने महावृक्षात रूपांतरित केलें ते आपल्या जादुई गोड गळ्याने आणि संगीतातील (Singer) सर्व प्रकारच्या चालीत सारख्याच सहजतेने लीलया केलेल्या गायकीने.
तिच्या आवाजात "लता दीदी आणी रफी यांच्यासारखीच अफाट रेंज होती म्हणूनच अभंग, नाट्य, करुण, शृंगार, कॅबरे लोकगीत अशी सर्वच ढंगात असलेली हजारो गाणी तीने अश्या काही जोशात आणि अवेशात सादर केली कि ती गाणी "पडदा, सिनेमा, गीतकार, संगीतकार यांना छेदन देत तिची स्वतःची झाली, तिच्या "आशा गाण्यांचे "असे एक स्वतंत्र लोभस नाणे गोल्डन इरातील गाण्यात पडले. हंसराज बहेल (ज्याने लताला "जब रात नही कटती जिंदगी कैसे कटेगी सारखे अवीट गोडीचे गाणे दिले (जेवरात या सिनेमांत )त्या बहेल ने तिला पहिले स्वतंत्र हिंदी सोलो गाणे दिले त्यापूर्वी दहाव्या वर्षी तीने पार्श्वगायन केलें होते आणि नंतर गीता दत्त, आणी जोहराबाई यांसोबत गायली होती पण नंतर तीने मागे वळून पाहिले नाही, तिचा कलाप्रवास सोपा नव्हताच, काटेरी मार्गाने त्यांना कायम चालत रहावे लागले, गाणी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली, कारण खरी स्पर्धक घरातच होती "लता दीदी यांच्या रूपात... असो
मला आवडलेल्या त्यांच्या काही गाण्यांच्या सुंदर रांगोळ्याचे दर्शन घडवत त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. त्यांची "जिवलगा राहिले रे दूर घर माझे "चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले "कोकिळा गा "हात नका लावू माझ्या साडीला "ब्रम्हा विष्णू आणी महेश "ही वाट दूर जाते "समईच्या शुभ्र कळ्यांनी "तरुण आहे रात्र "माझा होशील का?"तू दूर दूर तेथे "विसरशील खास मला "धुंदी कळ्यांना "चंद्र आहे साक्षीला, "बुगडी माझी सांडली ग" स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा "रामा रघु नंदाना "धागा धागा अखंड विणू या अश्या सुंदर भावगीत, भक्ती गीत यांच्या स्वर रांगोळ्या आहेत. तशाच हिन्दीतील "आंखोसे जो उतरी है दिलमे, "जाईये आप कहा जायेंगे "चैन से हमको कभी आपने जीने न दिया "बेकसी हद से गुजर जाये "आईये मेहेरबान, "पंछी रे ओ पंछी, "सच हुये सपने "तोरा मन दर्पण कहेलाये "दिल चीज है क्या "आंखोमे क्या जी "ओ मेरे सोना रे, "बाहोमे चले आओ, "अशको से हमने 'तेरी तस्वीर बनायी है, "जब चली थंडी हवा, "ओ पंछी प्यारे, "आणी "वो सुबह कभी तो आयेगी...
अश्या अनेक सुंदर गाण्यांच्या सुंदर रांगोळ्या मागे ठेवून "आशाजी हे भौतिक जग सोडून, चाहत्याना दुःखाच्या सागरात लोटून "राहिले रे दूर घर माझे म्हणतं "देवाच्या सर्वात मोठ्या घरात कायम स्वरूपी रहायला गेल्या आहेत... आणखी एक "मंगेशी सूर" मंगेशीच्या गाभाऱ्यात कायमचा निमला, मागे "आशा सुरांची शांत स्नीग्ध समई रसिकांच्या मनात वर्षानुवर्षे तेवत राहील हे नक्कीच. तिच्या जाण्याने माईची खूप आठवण झाली, देवघरातील तिच्या फोटोला रोज हळदी कुंकू वाहणारी भाबडी माई... आशा ताईंच्या पवित्र आत्म्यास आपले दत्तगुरु शांती प्रदान करोत. ॐ शांती
(लेखक - दिलीप मोडक)
ट्रेंडिंग न्यूज
























