एक्स्प्लोर

प्रिय मराठयांनो...

प्रिय मराठयांनो, माझं गाव कोपर्डी. माझं नाव…… जे तुमच्या मुलीचं असेल ते. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदिलाने लाखोंच्या संख्येने शांतपणे आणि शिस्तीत मोर्चा कसा काढतात हे जगाला दाखवून दिलं. एकत्र यायला कुठल्या नेत्याची गरज नाही हे सिध्द केलं. मला तुमचा अभिमान आहे. कारण मी पण मराठा आहे. पण स्वातंत्र्य मिळण्याआधी जो महाराष्ट्रात राहणारा तो मराठा असं समजायचे लोक. मराठा ही फक्त जात नाही. समाज नाही. साम्राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. अटकेपार झेंडे लावणारे मराठे. जातीपातीच्या भानगडीत न पडता शिवाजी महाराजांच्या नावाने जीव ओवाळून टाकायला तयार असणारे मराठे. मराठा तितुका मेळवावा असं अभिमानाने वाटावं असे एकदिल आणि एकजीव मराठे.

पण हे कौतुक करायचे दिवस आहेत? उस पिकवणारा शेतकरी कधी उसतोड कामगार झाला हे आपलं आपल्याला तरी कळलं का? सगळ्या गावाने ज्याच्यावर अवलंबून रहावं असा कुणबी अचानक सगळ्या जगावर अवलंबून असल्यासारखा का वागतोय? गावगाड्याला धीर देणारा मराठा आत्महत्या का करतोय? लोकांच्या चुका आहेत पण आपल्याही काही चुका झाल्याच ना.

आज लोकांच्या भीतीने घराचा उंबरठा न ओलांडणारी लेक कालपर्यंत उंबऱ्याआड का होती? आपणच अडवून ठेवलं होतं तिला. आपण भावकीला बांध ओलांडू द्यायचा नाही म्हणून अडून बसलो. लोक देशाची सीमा ओलांडून जात होते. नवे नवे देश पहात होते. बारीक विचार केला तर आज फक्त आपणच जाती आणि मातीला चिकटून बसलोय. ह्या जातीचा आणि मातीचा अभिमान सोडला पाहिजे आपल्याला. खरंच आपल्याला काय दिलं या जातीने? अभिमान. इतिहास. पण या इतिहासाच्या ओझ्याखाली आपण एवढे द्बलोय की आपण आपल्या हजारो भावांवर दरवर्षी विष पिऊन जीव द्यायची वेळ आलीय हे पण मान्य करायला तयार नाही. आपल्याला अभिमान पाहिजे फक्त शिवाजी महाराजांचा. ज्यांनी जात मानली नाही. प्रत्येक जातीचा माणूस त्यांच्या दरबारात होता. सेवेत होता. प्रेमात होता. विचार करा महाराज जर फक्त मराठ्यांनी युध्द लढायचं असं ठरवून युध्द लढले असते तर काय झालं असतं? मुसलमान, ब्राम्हण, न्हावी, धनगर, माळी ….मला सांगा कुठली जात शिवाजी महाराजांच्या मदतीला आली नाही? महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक जातीने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करण्यात मदत केली. आणि जेंव्हा गुन्हा झाला तेंव्हा महाराजांनी त्याची जात बघितली नाही. त्याला तटस्थपणे शिक्षा दिली. मग आपण एका गुन्हेगाराच्या जातीत का अडकलोय? या देशात यापुढे कुठल्याच जातीचा, कुठल्याच धर्माचा कुठलाच हरामखोर बलात्कार करू शकणार नाही असा मोर्चा आपण का नाही काढायचा? जातीला भीती दाखवायची नाही. गुन्हेगारांना भीती दाखवायचीय गरज आहे. आणि महाराष्ट्रात तरी आपण मराठे मोठे भाऊ म्हणून हे नक्कीच करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक किंवा अहिल्याबाई होळकर. नकळत एका जातीत गुंतले. गुंतवले गेले. त्यांना आपल्याला जातीच्या चौकटीतून मुक्त करायचंय. आणि हो शिवाजी महाराजांना त्याच मार्गावर नेऊ नका. सध्या जातीपाती पलीकडे जयंती साजरी केला जाणारा हा एकमेव मराठी माणूस आहे याची जाणीव ठेवा. देव सुद्धा जातीपातीत वाटले गेलेत. फक्त शिवाजी महाराज उरलेत. जे अजूनही सगळ्यांचे आहेत. त्यांच्यासाठी. त्यांची शप्पथ आहे तुम्हाला.

मला सांगा मराठा जातीच्या नावाने राजकारण करणारा कोण अॅट्रॉसिटीबद्दल उघडपणे बोलतोय? मग तुमचा आयुष्यात कधी अॅट्रॉसिटीशी संबंध आलेला नसताना कशाला विषय काढता? अन्याय झाला तर किती संख्येने तुम्ही एकत्र येऊ शकता हे लक्षात आलं आता. पुन्हा पुन्हा हे दाखवून द्यायचं का? कुणी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला तर पुन्हा एकत्र येऊ असेच शांतपणे. पण आता ती गरज आहे का? अॅट्रॉसिटीला एवढा विरोध एकट्याच जातीने का करायचा? एकाच जातीला भीती आहे असं दाखवून द्यायचंय का? मग? खरंतर आता दाखवून द्यायचं की आपण मोठे भाऊ आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता बघून मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलेले शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आठवा. तुम्ही प्रोत्साहन देणारे आहात. चिथावणी देणारे नाही. तुम्हाला अॅट्रॉसिटी नाही, महाराष्ट्रातला जातीयवाद संपवायचा आहे. शपथ घ्या. आवळा दाखवून कोहळा काढणाऱ्या भुरट्या लोकांच्या सभेला गर्दी करणारे आपण उरलो नाही. आता आपण आरक्षणाच्या नावाने वर्षानुवर्ष मूर्ख बनणारे लोक नाही. इतर जातींना धाक दाखवण्यासाठी आपण एकत्र आलो नव्हतो आणि इथून पुढेही यायचं नाही. आपल्या नावाने, आपल्या महाराजांच्या नावाने राजकारण करणारे आणि सगळ्याच पक्षात असलेले कावळे हुसकवायला आपण जमलोय. जमणार आहोत. आता कुठल्याच पक्षाने कुठल्याच जातीचा आणि शिवाजी महाराजांचा फायदा घ्यायचा नाही. महाराज कुणाच्या घरची मालकी नाही. महाराज महाराष्ट्राचे आहेत. देशाचे आहेत. जगातले सगळ्यात थोर योद्धे आहेत. आणि या भूतलावर असे निर्व्यसनी, चारित्र्यवान आणि सगळ्या जातींना आणि धर्मांना सोबत घेऊन लढलेले राजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सुद्धा झाले नाही. महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते. स्वराज्याचे होते. आणि आपण मराठे म्हणजे जात नाही महाराष्ट्र आहोत. भारतात राहणारा प्रत्येकजण भारतीय आहे आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण मराठा आहे. शिवरायांचा भक्त आहे.

जात म्हणून जमलेल्या मराठयांनो, कळकळीची विनंती आहे आता स्वप्नात रमायचं नाही. भुरट्या लोकांच्या दरबारात जमायचं नाही. शेतातल्या बांधात अडकायचं नाही. आता जगाच्या सीमेचा विचार करायचा. काळी आई म्हणून मातीला चिटकून बसायचं नाही. मातीत काहीच येत नाही हाती. मातीत फक्त मातीच होते आता. इथून पुढ पेरते व्हा हा मंत्र विसरून जायचा. आता कर्ते व्हायचं. ज्याला शेती करायची त्याला करुद्या. पिकवू द्या. घाम गाळू द्या. इथून पुढ जातीला नाही शेतीला आरक्षण पाहिजे. शेती करणाऱ्याला मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातला एकतरी पोरगा नौकरीत पाहिजे. नाहीतर खा म्हणावं ढेकळं. मराठा राजकारणामुळे गरीब शेतकरी बदनाम झाला. हा जातीचा नाही शेतीचा प्रश्न आहे. सवलत झेड पी आणि ग्रामपंचायतीत वर्षानुवर्ष खुर्च्या उबवणाऱ्या मुजोरांना कशाला पाहिजे? गरज आहे ती कोरडवाहू शेतकऱ्याला. अल्पभूधारक शेतकऱ्याला. जात कोणतीपण असो शेतकऱ्याला आरक्षण द्या म्हणून मागणी करा. आरक्षण लोकांचं पोट भरणाऱ्याला मिळालं पाहिजे. शहरातल्या झोपडीवर डिश अँटेना दिसतो. गावात पक्षाचे झेंडे दिसतात. हा फरक आधी संपला पाहिजे. मोर्चात घरच्या भाकरी बांधून येणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगात बळ कसं येईल हा महत्वाचा प्रश्न आहे. संख्याबळ महत्वाचं नाही. मोर्चात येणाऱ्या मजुराच्या आर्थिक ताकदीचा प्रश्न महत्वाचा आहे जातीच्या ताकदीपेक्षा. एकच प्रश्न विचारू? बलात्कारामुळे एवढे लाखो लोक जमताय तुम्ही. माझे शेतकरी बांधव आत्महत्या करतात तेंव्हा का एकत्र येत नाही? इथून पुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असं काहीतरी करा आता एकत्र येऊन. एवढ नक्कीच करा. तरुणपणीच विधवेचं जीवन जगायची वेळ आलेल्या आपल्या बहिणींसाठी एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येक जातीत जातीच्या नावाने आग लावणारे हरामखोर नेते आहेत. त्यांच्या भल्यासाठी वेळ घालवू नका. अॅट्रॉसिटी पेक्षा आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचा प्रश्न जास्त मोठा आहे. त्यात लक्ष घाला. हात जोडून विनंती करते, माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला माझा एखादा मराठी भाऊ जेलमध्ये गेला हे मला कधीच आवडणार नाही. माझा एखादा भाऊ पोलीस ऑफिसर झाला तर मला जास्त अभिमान वाटेल. माझा प्रत्येक भाऊ कायद्याचा रक्षक झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. मोर्चातून काही घडलं पाहिजे ना? मग हे घडवा. एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची सोय करा. शेतकऱ्याला आरक्षण मिळवून द्या. शेतीतून, मातीतून जन्मलेले अधिकारी घडू द्या. बलात्काराएवढीच शेतकरी आत्महत्येची पण तळमळ वाटू द्या. एकाही मराठा नेत्याने आपल्या शाळेत, कॉलेजमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला मोफत शिक्षणाची घोषणा केली नाही. एकाही मराठा नेत्याच्या साखर कारखान्यात मराठा जातीच्या उसाला जास्त भाव नाही. एकाही मराठा नेत्याच्या पक्षात मराठा तरुणाला विधानसभेत सोडा नगरसेवक म्हणून फुकट उमेदवारी नाही. एकही मराठा नेता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकांसाठी काही चांगली योजना घेऊन येत नाही. मग काय करायचं? गप्प बसायचं? नाही. आधी जातीच्या नावाने बोंब मारणाऱ्या लोकांपेक्षा शेतीच्या नावाने एक होणारी माणसं बघायची. टाटा सफारी, स्कॉर्पिओ किंवा बुलेटच्या मागे नंबर प्लेटवर धुळीत माखलेले महाराज शोधायचे. नंबरप्लेटसोबत मालक पण घासून पुसून साफ करायचा. शोधायचा नवीन मावळा. ज्याच्या नंबरप्लेटवर नाही हृदयात शिवाजी महाराज आहेत. जो जातीसाठी नाही देशाच्या मातीसाठी शिवाजी महाराज मानतो. मला तर आज राजकारणात असा एकपण नेता दिसत नाही. एकपण पक्ष दिसत नाही. पण तुम्ही महाराष्ट्र धर्म म्हणून असेच एकत्र राहिला तर यांच्यातल्या एखाद्याला अक्कल येईल. पुन्हा महाराजांच्या मनातलं स्वराज्य येईल. महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र पहायचा असेल तर आधी सगळ्या जातीला बरोबर घेऊन चालायला शिकलं पाहिजे.

लक्षात ठेवा. इथून पुढे मोर्चा मराठ्यांचा पाहिजे. पण धर्म पाहिजे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठा आहे ही भावना पुन्हा निर्माण झाली पाहिजे. कारण माझ्या शिवाजी महाराजांचं कौतुक कशामुळे आहे? ‘तर महाराष्ट्र धर्म राहिला काही. तुम्हा कारणे.’ माझ्या शिवाजी महाराजांच्या मनात होतं तसं सुराज्य पाहिजे. माझ्या जिजाऊच्या स्वप्नातला महाराष्ट्र पाहिजे. शेतकऱ्यासाठीची महात्मा फुलेंची तळमळ आठवा, आंबेडकरांचे शेतकऱ्यासाठीचे विचार वाचा, शरद जोशींचे प्रयत्न आठवा, आज मराठा नसलेले किती लोक शेतकऱ्यासाठी त्याने आत्महत्या करू नये म्हणून काम करतात त्याचा विचार करा. आता तुम्ही सुरुवात चांगली केलीय. आदर्श घालून दिलाय. मी कारण झाले. पण पुन्हा कोपर्डीची आठवण नको. कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक नराधमाची दातखीळ बसली पाहिजे. कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक मराठ्याने सांगितलं पाहिजे ही महाराष्ट्रातली मुलीवरच्या अत्याचाराची शेवटची घटना. यानंतर पुन्हा कुठल्या हलकट कुत्र्यांची मुलींकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. कारण एक मराठा म्हणजे फक्त एक लाख मराठा नाही. एक मराठा म्हणजे एक महाराष्ट्र. माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र.

इथून पुढे प्रत्येक मोर्चात नगर, खैरलांजी, दिल्ली, मुंबई प्रत्येक मुलीवर झालेल्या अन्यायाचा निषेध झाला पाहिजे. माझ्या शिवाजी महाराजांची शप्पथ आहे तुम्हाला. मी आपण मराठा असं म्हणतेय कारण मी मराठा ही जात मानत नाही. मराठा हे साम्राज्य मानते. जो शिवाजी महाराजांना मानतो तो मराठा. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा. जय हिंद!

( लेखक अरविंद जगताप यांच्या वेबसाईटची लिंक : http://www.arvindjagtap.com/ )
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!

व्हिडीओ

Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद सर्वकाही नाही; मी जनतेचा आवाज - मुनगंटीवार
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद माझ्यासाठी सर्वकाही नाही,  मी जनतेचा आवाज उठवणारा! | ABP Majha
Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Pandharpur News : पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की,
पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
Vidhan Parishad Election 2026 :  विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Embed widget