एक्स्प्लोर
पंचम, गुलजार आणि मी !

'पंचम, गुलजार आणि मी', हे मी ब्लॉग म्हणून लिहिलेले नाहीय. मध्यरात्रीनंतर अशीच काही गाणी आठवली आणि त्याबद्दल मला काय वाटतं, हे मी फेसबुकवर पोस्ट केले. त्या 3 पोस्ट मिळून हा ब्लॉग तयार झालाय. पण एक साधर्म्य मला यात नंतर आढळून आलं, ते म्हणजे, तिन्ही गाणी स्त्रीप्रधान भूमिकांची आहेत. तिन्ही गाणी दिग्गज स्त्रियांनी गायली आहेत आणि तिन्ही गाण्यात हीरो असून नसल्यासारखा आहे. इतर गोष्टी ब्लॉग वाचल्यावर तुम्हाला कळतीलच. आणि हां, पंचम आणि गुलजार यांचीच गाणी का निवडली याचे उत्तर मलाही माहित नाही, आणि ते शोधायचा प्रयत्न देखिल मी केला नाही, असो. ब्लॉग म्हणून न लिहिलेला हा ब्लॉग, आता तुमच्यासाठी....दिवस पहिला ठिकाण : ऑफिस वेळ : पहाटेची ऐसा समा ना होता... कुछ भी यहाँ ना होता... आता या वेळेस हे गाणे आठवायची तशी काही गरज नव्हती. पण अनायसे आठवले आणि मग इतके दिवस फक्त एफएमवर ऐकून आवडत असलेल्या गाण्याला बघवेसे वाटले. दोन...तीन...चार... अशा कित्येक वेळा बघितल्यावर आता खरच मन भरून आलंय. आरडीने अनेक हीरो आपल्या गाण्याने मोठे केले. पण ऐंशीच्या दशकानंतर (आशा भोसले सोबत लग्न झाल्यावर) त्याची गाणी अंतरंग हेलावून सोडणारी वाटू लागतात. विशेषतः तो स्त्रीचे अंतरंग, त्यांच्या भावना, त्यांच्या प्रेमाच्या कल्पना यांना खूप महत्त्व देऊन गीत रचतोय की काय असे वाटू लागतं. या गाण्यात नेहमीचीच फुले, बाग़, उत्कृष्ट देखावे आहेतट. पण गाण्याची चाल मनाला अधिक भावते. पूर्ण गाण्यात स्क्रीनवर संजय दत्त दिसतो. पण त्याला एकही ओळ आरडीने दिलेली नाही हे विशेष. फक्त हिरोईन आणि तिच्या भावना यात आहेत. त्यात एक ट्विस्ट म्हणजे ध्रुपदाला दोन चाली आणि दोन वेगवेगळे ताल वापरले आहेत. त्यामुळे गाण्यात जान येते. आणि इतकं सगळं असताना, त्यावर लता दीदी आणि त्यांच्या मुरक्या आहेतच. यातही एक गोम आहे. आशा सोबत लग्न झाल्यावर आरडीने अनेक स्त्रीप्रधान भूमिकेची गाणी आणि रोमँटिक गाणी ही आशाला दिलेली आहेत. ( इजाजतमधले कतरा करता मिलती है ) पण काही मोजकी गाणी त्याने लता दीदीला दिली. त्यांपैकीच हे एक गाणे. असो. ऐका कधीतरी. (‘कतरा कतरा’बद्दल पुन्हा कधीतरी) दिवस दुसरा ठिकाण : तेच वेळही : तीच थोड्या वेळात अनेकांची सकाळ होईल. मी मात्र नशेत असेन, इजाजतची गाणी, गुलजार आणि पंचमच्या सुरावटींच्या. कालच म्हणालेलो की ‘कतरा कतरा’ गाण्याबद्दल लिहेन. आज लिहितोय. आशा भोसले यांचा आवाज, साधं सोपं संगीत, अगदी थोडे कठीण शब्द (गुलजारच्या इतर कवितेच्या मानाने) आणि मंत्रमुग्ध करणारे देखावे, याने हे गाणं इतर इतर गाण्यांपेक्षा अतिशय रिच होऊन जातं. याच चित्रपटात अजून तीन गाणी आहेत. ती म्हणजे- मेरा कुछ सामान, छोटी सी कहानी से आणि एक गझल. यातल्या ‘मेरा कुछ सामान’बद्दल तर सर्वांना माहितच आहे. पण त्याहीपेक्षा जर मला कोणते गाणे आवडले असेल तर ते हे : कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो, जिंदगी है, बहने दो, प्यासी हूँ में प्यासी रहने दो फक्त ध्रुपद आपल्याला जिंदगीचे सर्वांगीण अर्थ सांगून जाते. यातला प्रत्येक शब्द तोलून वापरलाय गुलजारने. गाण्याची खरी जादू आहे ती डबल ट्रॅकमध्ये. म्हणजेच मुख्य गायक गाताना मागून पुन्हा त्याचाच आवाज, कोरस न वापरता लावणे हे त्या काळी कसे काय शक्य केले पंचम आणि देव जाणे. पण शेवटी नावात पंचम आहे त्याच्या. त्यावर आशाताई यांनी सेकेण्ड ट्रॅकची प्रत्येक ओळ वेगळी गायली आहे. प्रत्येक शब्द आपल्याला, त्याच्या मुरकीवरुन लक्षात राहील इतकी वेगळी. (या चित्रपटाची सर्व गाणी फक्त आशा भोसले यांनी गायली आहेत तरीही) दूसरी गोष्ट आपल्याला हरखून ठेवते ती म्हणजे, प्रत्येक फ्रेम, प्रत्येक लोकेशन आणि नसरुद्दीन आणि रेखाचा नैसर्गिक अभिनय. कवितेत असलेला प्रत्येक शब्द त्या त्या लोकेशनला जाऊन लिहिलाय की काय असा भास होतो. शेवटी गीतकार आणि दिग्दर्शक एकच असल्यावर अपेक्षा वाढतात ना, गुलजारने पण जीव ओतलाय. कुठेच कमी ठेवली नाहीये. आधीच्या गाण्याप्रमाणे यात पण स्त्रीचे भावविश्व आहे, नसरुद्दीनला एकही ओळ दिलेली नाही, फरक इतकाच की ती लग्न झालेली आणि नवऱ्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम असलेली आहे. इतकं असूनही ती, त्याच नवऱ्याने आपले आयुष्य कसे बदलून टाकले ते सांगतेय. एक बोचरी जखम मनाला असूनही ती प्रत्येक क्षण जगतेय. दुःखाला असलेली दूसरी सुखाची बाजू आपल्याला या गाण्यामुळे कळते. गाण्याच्या चालीतुन ते सुख आणखी जवळ येतं, पंचमच्या स्वतःच्या जीवनाचा किंचित प्रभाव चालीवर आहे, कवितेवर आहे, कारण तो पण असाच, थोड्या गोष्टिंमध्ये सुख मानणारा होता. त्याला जास्तिचे काही नको होते. म्हणून गाण ऐकताना, आपण नदीच्या काठवर उभे असतो आणि संपल्यावर पाण्याच्या आवेशात आकंठ बुडालेलो असतो, ऐकून बघा हवा तर! अशाच आणखी एका गुलजार आणि पंचमच्या गाण्याने मला बंदिस्त केलंय. त्याबद्दल उद्या लिहितो. दिवस तिसरा ठिकाण : तेच वेळही : तीच कालची पोस्ट अर्धवट राहिलेली आणि गाणं देखील. आज पूर्ण करतोय. वेळ पुन्हा तिच... असो. लहानपणापासून मी हे गाणं ऐकतो आहे. एफएमवर, पंचम आणि गुलजार यांच गाणं आहे इतकंच काय ते ठाऊक होतं, पण गाणं ऐकून एक विलक्षण विषण्णता दाटून यायची, आजही येतेच. गाणं कशाबद्दल आहे काही माहित नव्हतं जोपर्यंत एका मित्राने मला सांगितलं नाही की ही एक अंगाई आहे. तेव्हा मनात वाटलं, वाह रे गुलजार, तुझ्या गाण्यात अशी पण जादू आहे तर... चित्रपट आहे मासूम (1983), यातलं "तुझसे नाराज नहीं जिंदगी" कोणाला माहित नाही, त्यामध्येच हे एक गाणं पण आहे. गाणं साधं सोप्प वाटतं तस नाहीये. गुलजारने जे शब्द लिहिलेत त्यातच एक उदासीनता आहे. एका अश्रूला आपल्या जीवनाशी जोडून दोघे कसे एकच आहेत हे सांगितलं आहे. एक आई तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा वाइट अनुभव घेतेय आणि सोबत मुलांना पण झोपवते आहे. त्यांना सांगायचा प्रयत्न करतेय, आयुष्यतली व्यथा, दुःख आणि लागलीच येणारी कर्तव्य. दोन डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुची कहानी सांगताना, स्वतः रडत नाहीये. "है तो नयी फिर भी है पुरानी" म्हणत दुःख हलक करतेय. पण रडत नाहीये. रडतोय तो तिचा सावत्र मुलगा. या एका थॉट साठी शेखर कपूरला (दिग्दर्शक) मी सगळे अवार्ड्स देइन. आई म्हणून दाखवलेली शबाना, आपल्या दोन्ही मुलांना झोपवतेय आणि तिची अंगाई ऐकून तिचा सावत्र मुलगा दरवाज्यात उभं राहुन, किलकिल्या डोळ्यांनी फक्त बघतोय. शबानाच्या दोन मुलींमध्ये एक उर्मिला मातोंडकर आहे, तर सावत्र मुलगा जुगल हंसराजने साकारलाय. शबानाला तो जरी आवडत नसला तरी त्याला देखिल ती अनपेक्षितपणे सूचवतेय, "एक ख़त्म हो, तो दूसरी रात आ जाती है। होटों पे फिर भूली हुई बात आ जाती है" तू मला जरी प्रिय असलास तरी नवर्याने केलेली चुक मी विसरु शकत नाही. एका आईच अश्या परिस्थितल दुःख आणि सावत्र मुलाच्या मनाताली आईची ओढ़ एकाच वेळी वेगळे शब्द न वापरता गुलजारने लिहिले आहेत. सिम्पली ग्रेट. आणि मग या सर्व दुखितांना एकत्र, एका सुरात ओवण्यासाठी पंचम आहेच. एक सरळ रेष ओढावी, इतकी साधी चाल त्याने या गाण्याला दिली आहे. तसा पंचमच्या उतरतीच्या काळाच्या अलिकडच्या काळातला हा चित्रपट. तरी ऐकणार्याचे मन आणि नजर शून्यात घेऊन जायची जादू या सुरावटीमध्ये आहे. कदाचित गुलजारला काय सांगायचे आहे हे फक्त पंचमलाच कळत असावे. यात आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे, लता, आशा, चित्रा अश्या सर्व प्रतिथयश आणि इतकी वर्षे सोबत काम केलेल्या गायिकांना बाजूला ठेवत आरती मुखर्जीला दिलेली संधी, पंचमची कलाकारांची अचूक निवड दाखवुन जाते. तिला याच गाण्यासाठी मग फिल्म फेयर देखील मिळाला. पंचम आणि गुलजारने अशी असंख्य गाणी आपल्याला भेट म्हणून दिली आहेत. कधी वाटलं तर त्यांच्याबद्दल पण लिहेन, पण आता थांबतो. अगदीच चार वगैरे वाजलेत आणि तुमच्या मनातल्या कहाणीला वाट करून द्यायला हे गाणं एकदा ऐकून बघा...
View More
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion






















