![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
हे तळं नाही तर विहीर! बीडच्या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्चून एक एकरात बांधली विहीर; कशी आहे ही विहीर?
Beed Farmers Well : बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्च करून ही विहीर बांधली आहे.या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे
![हे तळं नाही तर विहीर! बीडच्या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्चून एक एकरात बांधली विहीर; कशी आहे ही विहीर? Beed Farmers Well beed News farmer built very big Well in his farm Well built at a cost of Rs 1.5 crore हे तळं नाही तर विहीर! बीडच्या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्चून एक एकरात बांधली विहीर; कशी आहे ही विहीर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/ab4876f9d4113e1ebac203dce78bfff7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Beed Farmers Well : तुम्ही आम्ही प्रत्येकाने कधी ना कधी काठोकाठ पाण्यानं भरलेली विहीर नक्कीच बघितलेली आहे. पण आम्ही तुम्हाला दाखवत असलेली अशी विहीर तुम्ही नक्कीच यापूर्वी कधीच पाहिलेली नसेल. बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्च करून ही विहीर बांधली आहे. 41 फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद असलेल्या या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे. ही विहीर गुगल मॅपवर देखील स्पष्टपणे दिसत असून सध्या या विहीरीची एकच चर्चा आहे.
धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग लगत बजगुडे यांची ही बारा एकर शेती आहे. दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नव्हते. म्हणून त्यांनी एक एकरमध्ये विहीर करण्याचा निर्णय घेतला. बजगुडे यांचा मूळ व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा आहे. ही विहीर पूर्ण बांधण्यासाठी त्यांना नऊ महिन्याचा कालावधी लागला.
या मधून निघालेलं जे मटेरियल आहे त्याची विक्री करून त्यातून मिळालेले 10 ते 12 लाख रुपये त्यांना विहीर बांधण्यासाठी कामी आले. आता या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी बागायती शेती करायला सुरुवात केली आहे.
बजगुडे यांनी बांधलेली ही एवढी मोठी विहीर आता इतर शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरतेय. त्यामुळे बीड मधूनच नाही तर शेजारच्या जिल्ह्यातून देखील अनेक शेतकरी ही विहीर पाहण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गर्दी करत आहे आणि या विहिरीजवळ आल्यावर तुम्हालाही सेल्फी काढण्याचा मोह आवरणार नाही.
मुबलक पाण्यावर बागायती शेती करण्यासाठी अनेक शेतकरी शेत तलावाची निर्मिती करतात मारुती बाजगुडे यांनी मात्र 10 कोटी लिटर पाणी साठवून ठेवता येईल अशी विहीर बांधल्याने गावातील शेतकऱ्यांना देखील त्यांचं अप्रूप वाटतंय. या विहिरीतील पाण्यावर आता कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये टरबूज पेरू आणि मोसंबीच्या बागा बहरू लागल्या आहेत.
पाण्याबाबतीत निसर्गाची मराठवाड्यावर कायम अवकृपा राहिलेली आहे. म्हणूनच मराठवाडा हा दुष्काळवाडा झाल्याचं चित्र सुद्धा आपण यापूर्वी पाहिलं होतं. तसं निसर्गानंही यावर्षी शेतकऱ्यांना भरभरून दिलं आणि एवढी मोठी आज पाण्याने काठोकाठ भरलीय. बाकी बजगुडे यांनी बांधलेली ही कदाचित राज्यातील सर्वात मोठी विहीर असावी.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)