राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: मतदार यादीतील अडचणी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अधिकार नसल्याचे म्हणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Maharashtra Local Body Election: राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हल्ला चढवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नसल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले. मतदार यादीतील अडचणी आधी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अचानक अधिकार नसल्याचे म्हणत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुठल्यातरी ‘रिमोट कंट्रोल’खाली निवडणूक प्रक्रिया
10 टक्के गोंधळ जरी असला तरी त्यामुळे किती मतदार वाढले याचा सवाल उपस्थित करत, डिजिटल युगात दुबार नावे स्पष्टपणे दिसत असतानाही त्यात बदल न होणे म्हणजे कुठल्यातरी ‘रिमोट कंट्रोल’खाली निवडणूक प्रक्रिया चालवली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग जे करत आहे ते निवडणुकीचा पोरखेळ असल्याची टीका करत, ब्राझीलच्या मॉडेलचा उल्लेख वारंवार केला जातो, मग त्याची अंमलबजावणी किती वेळा केवळ ‘स्टार’ केलं जाणार, असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राज्यातील मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका तसेच नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज घोषणा केली. निवडणूक रणधुमाळी 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.
माधानकारक तोडगा काढण्यात आल्याचा दावा
दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी वापरण्यात येणार असून ही यादी भारतीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदार यादीसंदर्भात काही तक्रारी व आक्षेप प्राप्त झाले होते. त्या सर्व आक्षेपांवर स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आणि प्रशासकीय निष्पक्षतेसाठी, ज्या अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी 5 वर्षे पूर्ण केली आहेत किंवा काही प्रकरणांमध्ये 3 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांची बदली करण्याचे धोरण राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. हे धोरण निवडणूक काळात प्रभावीपणे अंमलात आणले जाणार आहे.महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची बैठक घेतली होती. या बैठकीत मतदार याद्यांमधील संभाव्य घोळ, दुबार मतदार, तसेच तांत्रिक सुविधांबाबत चर्चा झाली. अनेक राजकीय पक्षांनी मतदार याद्यांतील त्रुटींविषयी चिंता व्यक्त केली होती, मात्र निवडणूक आयोगाने त्यांचे समाधान केल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत 7 टक्के मतदार दुबार आढळले
दुबार मतदारांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक विशेष तांत्रिक टूल विकसित केले आहे. या टूलच्या माध्यमातून दुबार मतदारांची अचूक ओळख करण्यात येत असून राजकीय पक्षांनी या टूलबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुमारे 7 टक्के मतदार दुबार आढळून आले असून, एकूणच दुबार मतदारांचे प्रमाण 5 ते 20 टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. दुबार मतदारांची सविस्तर माहिती संबंधित राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही दुबार मतदार शोधण्यासाठी स्वतःचे टूल विकसित केले आहे. तसेच राजकीय पक्षांना ‘Voters Search Facility’ पोर्टलवर संपूर्ण माहिती दाखवण्यात आली असून ‘मताधिकार ॲप’चीही माहिती देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























