Mumbai : Sahyadri State Guest Houseच्या छताच्या डागडुजीनंतर काही महिन्यांतच दुर्घटना कशी घडली?
तुम्ही दीड कोटी रुपये खर्च करून घर बांधलं आणि सहा महिन्यात ते कोसळायला लागलं तर त्याचा दर्जा काय असेल? पण महाराष्ट्र सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहात सार्वजनिक बांधकाम खात्यानं दीड कोटीपेक्षा अधिक खर्च करून केलेलं बांधकाम अवघ्या काही महिन्यांत कोसळलं. काही दिवसांपूर्वीच सह्याद्री अतिथीगृहाच्या छताचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. मंत्री आदित्य ठाकरे निघाल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली होती, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या कामासह इतर काही कामासाठी थोडथोडके नाही तर दीड कोटी रुपयांचं बिल सार्वजनिक बांधकाम विभागानं काढल्याची कागदपत्रं माझाच्या हाती लागलीत. अतिथीगृह आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर अशीच कामं दाखवून कोट्यवधी रुपयांवर काही अधिकाऱ्यांकडून डल्ला मारला जात असल्याचा प्रकार यामुळे समोर येतोय.























