Raj Thackeray Sabha : राज कुणाला धारेवर धरणार? कुणाचे कान टोचणार?
राज ठाकरे आज काय बोलणार?, कुणावर बरसणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. खरंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी, अर्थात ९ मार्च रोजी राज ठाकरेंचे टीकेचे बाण कुणाकडे झेपावणार, याची चुणूक दाखवली होती. गेल्या काही दिवसांत भाजपसोबत राज ठाकरेंची वाढलेली जवळीक चर्चेत असतानाच, ९ मार्च रोजी राज ठाकरेंनी राजकारणात भरती किंवा ओहोटी येतच असते, आणि आता भरती सुरू आहे, हे भाजपने लक्षात ठेवावं, अशा शब्दांत सुनावलं होतं. त्याचसोबत, महाराष्ट्रात काही महिन्यांपासून घडत असलेल्या घडामोडींवरही राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याएवढी पातळी कधीच घसरली नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदे, उद्धव ठाकरे आणि एकूणच नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवरून सर्वपक्षीयांचे कान टोचले होते. त्याचसोबत, वर्धापनदिनी राज ठाकरेंनी खरा पिक्चर गुढी पाडव्यालाच दिसेल असं सूचक वक्तव्यही केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज कुणाला झोडपून काढतायत, हे पाहणं महत्त्वाचं असणारेय. अर्थात, मनसेची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, कोणत्या पक्षासोबत जाणार? याबाबतही काही संकेत राज ठाकरे देतायत का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अर्थात, राज ठाकरेंच्या आजच्या सभेलाही हिंदुत्वाच्या मुद्द्याची किनार असेल, हे वेगळं सांगायला नको.