Dada Bhuse On Lal Vadal : कृषिमंत्री दादा भुसे आणि अतुल सावे चर्चेसाठी मोर्चाला सामोरे जाणार
शेतकऱ्यांचं लाल वादळ एक एक पाऊल टाकत मुंबईच्या दिशेने सरकतंय. नाशिकमधून निघालेला किसान सभेचा लाँगमार्च मजल दरमजल करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात धडकलाय. हातात लाल बावटा घेऊन निघालेल्या या हजारो मोर्चेकऱ्यांच्या जत्थ्यामुळे रस्तेच्या रस्ते लाल झालेत. या लाल वादळात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची आक्रमकताही तितकीच लालभडक आहे. भेटीसाठी दिलेल्या वेळा सरकारकडून सारख्या बदलत असल्याचा आरोप करत, आता चर्चा करायची असेल, तर आम्ही नाही, तुम्हीच या असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतलाय. शेतकऱ्यांच्या या आक्रमकतेमुळे सरकारही नमलंय, आणि चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकत, कृषिमंत्री दादा भुसे आणि अतुल सावे चर्चेसाठी मोर्चाला सामोरे जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारकडून होणारेत.




















