Chandrapur Floods | मध्य प्रदेशात मुसळधार चंद्रपुरातल्या नद्यांना पूर, पुरात अडकलेले नागरिक एअरलिफ्ट
गोसेखुर्द धरणाची सर्वच दारं उघडल्याने वैनगंगा नदीला मोठा पूर आला असून, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्याला मोठा तडाखा बसला आहे. वैनगंगा नदीत मिळणारे अनेक नाले डाब मारत असल्यामुळे अनेक गावांत पुराचे पाणी शिरले असून शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली आहे. रणमोचन गाव जलमय झाले असून इथं बोटी चालवल्या जात आहेत. येथील नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झाल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि मदत पोचवण्यासाठी बोटी चालवल्या जात आहेत. पिंपळगाव, आवळगाव इथंही घरं आणि शेती पाण्याखाली आली आहे. यामुळं भातासह भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे वैनगंगा नदीच्या आष्टी पुलावर पाणी चढल्यानं चंद्रपूर ते दक्षिण गडचिरोली मार्ग बंद झालाय. स्थानिक नागरिकांनी 1994 नंतरचा हा सर्वात मोठा भयावह पूर असल्याचे म्हटले आहे.


















