Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
मंडळी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतल्या श्री राम मंदिरातल्या दानचोरी प्रकरणात आज रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली. आणि राज्यातलं हिंदुत्वाचं राजकारण पुन्हा ढवळून निघालं. त्या पार्श्वभूमीवर नव्वदच्या दशकात टीपेला पोहोचलेल्या राम मंदिर आंदोलनाच्या स्मृती चाळवल्या.
नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
मंडळी, दिनांक सहा डिसेंबर १९९२... ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगेच्या घोषणा देत अयोध्येतल्या श्री राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात अखेर बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा जमीनदोस्त झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनांच्या पुढाकारानं झालेल्या आंदोलनात भाजपचे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंग आणि उमा भारती या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह विश्व हिंदू परिषदेची अशोक सिंघल, गिरीराज किशोर, साध्वी ऋतंबरा यांच्यासारखी नेतेमंडळी आघाडीवर होती. पण लाखो हिंदू आंदोलक वादग्रस्त ढाच्यानजिक पोहोचताक्षणी त्या आंदोलनाला कुणाचंही नेतृत्त्व राहिलं नव्हतं. आंदोलनाकांनी थेट वादग्रस्त ढाचावर चढून त्याची तोडफोड करायला सुरुवात केली. आंदोलक कुणाला ऐकत नाहीयत... ते शिवसैनिक आहेत असा निरोप नेत्यांपर्यत पोहोचले. त्यामुळं त्यांच्यापैकी काहींनी आंदोलकांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बघता बघता बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा कोसळला. आणि शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली, अशी बातमी देशभर पसरली. पण बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी स्वीकारण्याची एकाही राजकीय किंवा हिंदू नेत्याची तयारी नव्हती. त्यामुळं बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचं बोललं जातंय, यावर बाळासाहेबांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर बाळासाहेब त्यांच्या शैलीत ताडकन म्हणाले होते... होय, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.
बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यांच्या शैलीसारखंच अगदी कडवट होतं. बाबरी मशीद १९९२ साली पडली, पण त्याआधी १९८७ साली मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडून आले होते. त्याविरोधात दाखल झालेल्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयानं ही निवडणूक रद्दबातल ठरवली होती. इतकंच नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार तब्बल सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर १९९० सालच्या विधानसभा निवडणुकीतून बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा देशभर नेली.
शिवसेनेचं आणि हिंदुत्वाचं नातं असं होतं. पण २०१९ सालच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं सत्ता स्थापन केली. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणित एनडीएची सत्ता असतानाही उद्धव ठाकरेंचं भाजपच्या विरोधात जाणं त्यांना राजकीयदृष्ट्या किती आणि कसं भोवलं हे गेल्या चार वर्षांत आपण पाहिलं आणि पाहतोय. एकसंध शिवसेनेत उभी फूट पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या आघाडीमुळं याच काळात त्यांनी आणि एकसंध शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा झालेला प्रचार त्यांच्याविरोधात गेला.
त्यानंतर आता अयोध्येतल्या श्री राम मंदिरात झालेल्या दानचोरी प्रकरणात उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे.
All Shows
































