Virat Kohli मोठी बातमी: बंगळुरुमधील चेंगराचेंगरीप्रकरणी विराट कोहलीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल; अडचणी वाढण्याची शक्यता
FIR Against Virat Kohli: विराट कोहली याच्याविरुद्ध कब्बन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

FIR Against Virat Kohli: एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी (Chinnaswamy Stadium Stampede) भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल 2025 विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL Final 2025 Winner RCB) संघाचा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याच्याविरुद्ध कब्बन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांनी बंगळुरु शहरात मोठ्या उत्साहात विजय साजरा केला. मात्र या आनंदाला काळोखाची किनार लागली, जेव्हा स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हजारो चाहते एकत्र आले होते आणि स्टेडियमबाहेर अचानक गोंधळ निर्माण झाला. अफवा आणि व्यवस्थेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
नेमकं काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या पहिल्या आयपीएल विजयानंतर 4 जून 2025 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आयोजित केलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर RCB, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) आणि DNA एंटरटेनमेंट नेटवर्क्स यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. RCB च्या मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळेला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर #ArrestViratKohli हा हॅशटॅग ट्रेंड झाला, आणि एका सामाजिक कार्यकर्त्याने कोहलीविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली.
चेंगराचेंगरीनंतर विराट कोहली काय म्हणाला?
एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विराट कोहली देखील भावूक झाला होता. माझ्याकडे काही बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत... मी पूर्णपणे तुटून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली होती.
RCB च्या मार्केटिंग हेडला अटक-
आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला अटक करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी आरसीबीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निखिल सोसाळे हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्केटिंग आणि रेवेन्यू प्रमुख आहेत. निखिल सोसाळे हे आरसीबीचे एक प्रमुख सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत, जे बंगळुरूस्थित फ्रँचायझीसाठी सर्व पीआर आणि ब्रँड मार्केटिंग व्यवस्थापित करतात. निखिल सोसाळे हे आरसीबीच्या ब्रँड मार्केटिंगसाठी मोलाची भूमिका साकारतात. आयपीएलमध्ये संघाला आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून प्रमोट करण्यासाठी सर्व रणनीती आखण्याची जबाबदारी निखिल सोसाळे असतात. निखिल सोसाळे ही अशी व्यक्ती आहे, जे आरसीबीनं त्यांचं ब्रँड मूल्य कायम ठेवलं पाहिजे आणि ते ऑरगॅनिकरित्या वाढत राहावं याची खात्री करतात.





















