Sports News : लाडू भरवून केला ऐतिहासिक विक्रम साजरा; भारताचा सर्वात वेगवान धावपटू गुरिंदरवीर सिंगची आलिया भट्टने घेतली पहिली मुलाखत!
Gurindervir Singh Interview with Alia Bhatt: 10.09 सेकंदांचा ऐतिहासिक वेळ नोंदवून भारताचा सर्वात वेगवान धावपटू ठरलेल्या गुरिंदरवीर सिंगची 'अल्फा' चित्रपटाची अभिनेत्री आलिया भट्टने खास मुलाखत घेतली.

मुंबई : यश राज फिल्म्सच्या (YRF) बहुप्रतीक्षित आणि हाय-व्होल्टेज ‘अल्फा’ (Alpha) चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशातच, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने भारताचा नवा ट्रॅक सुपरस्टार गुरिंदरवीर सिंग (Gurindervir Singh) याच्याशी एक खास आणि भावनिक संवाद साधला आहे. नुकताच ट्रॅकवर अवघ्या 10.09 सेकंदांचा विक्रमी वेळ नोंदवत इतिहास रचणारा गुरिंदरवीर सध्या भारताचा सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर गुरिंदरवीरने पहिली मुलाखत आलिया भट्टला दिली असून, हा आनंद लाडू भरवून साजरा करण्यात आला. या मनमोकळ्या संवादात त्याने खेळ सोडण्याच्या कठीण काळापासून ते यशाच्या शिखरापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडला.
वडिलांचे अपूर्ण स्वप्न बनले प्रेरणा
संवादाची धमाकेदार सुरुवात करत गुरिंदरवीर म्हणाला, “सगळ्यांच्या पुढे आणि सर्वात वेगवान होण्यासाठी फोकस, जिद्द आणि हार्ड वर्क लागतो. रेडी?” यावर आलियाने त्याचे कौतुक करत विचारले की, "तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला भारतातील सर्वात वेगवान धावपटू बनायचं आहे?"
आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत गुरिंदरवीरने सांगितले की, "लहानपणी मी वडिलांच्या ट्रॉफीज आणि मेडल्स नेहमी स्वच्छ करायचो. त्यांचा व्हॉलीबॉल खेळतानाचा एक फोटो पाहून मीही देशासाठी काहीतरी करायचं ठरवलं. नंतर उसैन बोल्टचा वर्ल्ड रेकॉर्ड पाहिला आणि एथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला."
तो पुढे म्हणाला की, "वडिलांना दुखापत झाल्यामुळे खेळ सोडावा लागला होता. तेच त्यांचं स्वप्न नंतर माझं स्वप्न बनलं. रेस जिंकल्यानंतर मी सर्वात आधी त्यांनाच फोन करून विचार, ‘डॅडी, आता कसं वाटतंय? त्यावर ते म्हणाले, खूप मजा आली. माझ्या वडिलांनी स्वतःसाठी कधीच काही घेतलं नाही. कामावरून आल्यानंतर ते माझ्यासाठी जेवण बनवायचे. माझे पहिले महागडे स्पाइक्स (धावण्याचे शूज) त्यांनी न्यूझीलंडमधून आणले होते."
जेव्हा आईने दिला कठीण काळात धीर
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक कठीण काळ येतो, तसाच तो गुरिंदरवीरच्या आयुष्यातही आला होता. २०२४ मधील त्या प्रसंगाबद्दल सांगताना तो म्हणाला की, "अशी वेळ आली होती की मी पूर्णपणे खचलो होतो. मी वडिलांना म्हणालो की कदाचित आता माझ्याकडून हे शक्य होणार नाही. वडिलांनीही मला घरी परत येण्यास सांगितले. पण, त्यावेळी माझ्या आईने आम्हा दोघांना धीर दिला. तिने सांगितले की देवावर विश्वास ठेवा, हा कठीण काळही निघून जाईल. तिच्या याच शब्दांमुळे मी पुन्हा ट्रॅकवर धावू शकलो."
धावपट्टीचा खरा 'अल्फा' ठरलेल्या गुरिंदरवीरचा हा प्रवास देशातील हजारो तरुण खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला






















