IND vs PAK : ''आम्ही बोलून नाही तर मैदानात आमच्या प्रदर्शनाने स्वत:ला सिद्ध करु,'', बाबर आझम स्पष्टच बोलला
Ind vs Pak, Asia Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सामन्यापूर्वी आपली प्रतिक्रिया देत स्वत:ला मैदानातच सिद्ध करणार असल्याचं म्हटलं आहे.

Babar Azam about Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हा महामुकाबला रविवारी (28 ऑगस्ट) रंगणार आहे. या सामन्याची हवा सर्वत्रच पसरली असून पाकिस्तानचा कर्णधार आणि सर्वात महत्त्वाचा खेळाडू बाबर आझम (Babar Azam) यानेही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नुकत्याच झालेल्या आझमच्या पत्रकार परिषदेत त्याने भारतीय संघाला चेतावनी देत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ''आम्ही बोलून नाही तर मैदानात आमच्या प्रदर्शनाने स्वत:ला सिद्ध करु.'' असं वक्तव्य त्याने केलं आहे.
भारतीय खेळाडूंशी भेटीवर म्हणाला...
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंशी केलेल्या भेटीबद्दलही प्रतिक्रिया दिली. ''एक खेळाडू म्हणून असं एकमेंकाना भेटणं नॉर्मल आहे. आम्ही इतर संघाच्या खेळाडूंशीही भेटतो-बोलतो हे नॉर्मल आहे. सर्वजण भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत आहे. आम्ही देखील एक संघ आणि खेळाडूच्या रुपात हा सामना एन्जॉय करु.''
शाहीनला मिस करणार
बाबर आझमने सामन्यापूर्वी संघाबद्दल बोलताना आमचे अंतिम 11 कोण असतील हे ठरलं आहे, पण याचा खुलासा आम्ही उद्याच करु असं म्हटला आहे. तसंच संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा दुखापतीमुळे संघात नसल्याचं आम्हाला आता स्विकार करावं लागणार आहे. आम्हाला आमच्या युवा गोलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल ज्यांनी मागील बऱ्याच काळापासून दमदार खेळ दाखवला आहे. आम्ही शाहीनला नक्कीच मिस करु.
बाबर आझमकडे रेकॉर्ड करण्याची संधी
टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा गाठण्यापासून बाबर आझम 120 धावा दूर आहे. त्यामुळे तो भारताविरुद्ध पहिल्याच सामन्यात ही कामगिरी देखील करु शकतो. बाबर आझमनं आतापर्यंत 219 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 45.28 च्या सरासरीनं आणि 128 च्या स्ट्राईक रेटनं 7 हजार 880 धावा केल्या आहेत. ज्यात सहा शतक आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून फक्त शोएब मलिकला टी-20 मध्ये 8000 धावांचा टप्पा गाठता आलाय.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
