Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Bhose Pattern Statue : सोलापूरमधील मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत पुतळे हटवले असून आता कायदेशीर प्रक्रियेनंतर ते पुन्हा स्थापन करण्यात येणार आहेत.

सोलापूर : जिल्ह्यात अनाधिकृत महापुरुषांच्या पुतळ्यांवरून निर्माण होणाऱ्या तणावावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अवलंबलेला ‘भोसे पॅटर्न’ आता यशस्वी ठरताना दिसत आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसेनंतर माढा तालुक्यातील मोडलिंब येथेही ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत अनाधिकृत पुतळे हटवले आहेत. या पुतळ्यांना नियमानुसार परवानगी मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा वाजत गाजत स्थापन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
Solapur Statue Issue : प्रशासनाचा ‘भोसे पॅटर्न’ यशस्वी
सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा येथे झालेल्या वादानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी बैठक घेत प्रशासनाला विशेष मार्गदर्शन केले होते. अनाधिकृत पुतळ्यांवर थेट कारवाई करण्याऐवजी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
या पद्धतीनुसार, आधी ग्रामस्थांनी अनधिकृत पुतळे स्थलांतरित करायचे आणि त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने आवश्यक परवानग्या घेऊन पुन्हा विधिवत स्थापना करायची, असे मॉडेल राबवण्यात येत आहे.
Bhose Pattern Impact : भोसेनंतर मोडलिंबमध्येही प्रतिसाद
या मॉडेलचा पहिला सकारात्मक परिणाम पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे दिसून आला. त्यानंतर आता मोडलिंब गावातही याची पुनरावृत्ती झाली आहे. मोडलिंबमध्ये यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा बसवण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा पुतळाही शेजारी बसवण्यात आला. हे दोन्ही पुतळे अनधिकृत असल्याने संभाव्य तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.
Solapur Administration Action : संवादातून सुटला तणाव
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ग्रामस्थांशी संवाद साधला. पुतळ्यांना कायदेशीर परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतः पुढे येत दोन्ही पुतळे हटवले. यामुळे गावातील संभाव्य तणाव पूर्णपणे निवळला असून शांततेचा मार्ग निवडला गेल्याचे चित्र आहे.
Future Plan : परवानगी घेऊनच होणार स्थापना
आता पुढील एक ते दोन महिन्यांत प्रशासनाच्या मदतीने आवश्यक परवानग्या मिळवून पुन्हा विधिवत आणि वाजतगाजत पुतळ्यांची स्थापना केली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेला हा ‘भोसे पॅटर्न’ राज्यातील इतर भागांसाठीही आदर्श ठरू शकतो, असं मत व्यक्त होत आहे. या पद्धतीमुळे भविष्यातील सामाजिक तणाव टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाचं मत आहे.
ही बातमी वाचा:





















