करमाळ्यात हलगर्जीपणाचा कळस! गर्भवतीचे सिझर केले, आधी उडवा उडवीची उत्तरं नंतर गुंतागुंत वाढली अन्..., अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
Solapur: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur: करमाळ्यात प्रसुतीदरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा येथील विठ्ठल हाॅस्पीटलचे डाॅ.राम बिनवडे याच्या विरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश करमाळा न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा पोलीस स्टेशन येथे डाॅ.राम बिनवडे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत असतानाच करमाळा येथे प्रसुती दरम्यान मृत्यू झाल्या प्रकरणी आता डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Karmala)
नक्की प्रकरण काय?
करमाळा तालुक्यातील रायगाव येथील शितल भाऊसाहेब करगळ या 28 वर्षीय गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत पती भाऊसाहेब करगळ यांनी फिर्याद दिली आहे.या फिर्यादीत म्हटले आहे की , माझी पत्नी शितल करगळ ही गरोदर असल्यापासून करमाळा येथील विठ्ठल हॉस्पिटलचे डॉ. राम बिनवडे यांच्याकडे उपचार घेत होतो. गरोदर कालावधीत संपूर्ण उपचार डॉक्टर बिनवडे यांनी केले होते. डॉक्टरांनी प्रसूतीच्या दिलेल्या तारखेवेळी ता.9 सप्टेंबर 2024 रोजी 11.45 वाजता मी माझ्या पत्नीला घेऊन विठ्ठल हॉस्पिटल येथे आलो. त्यानंतर डॉ.बिनवडे यांनी तपासणी करून बाळाची आई व बाळाची तब्येत एकदम ठीक असून एक ते दीड तासात प्रसूती होईल असे सांगितले .परंतु बराच वेळ गेला तरी प्रसुती झाली नाही. यावेळी वेदना वाढू लागल्या याबाबत डॉ. बिनवडे यांना विचारले असता त्यांनी बाळाची व आईची तब्येत ठीक असल्याचे वारंवार सांगितले. माझी पत्नी शीतल हिला मोठ्या वेदना होत होत्या. मात्र डॉ. बिनवडे यांनी याबाबत कसलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही. शेवटी डॉ.बिनवडे यांनी पेशंटचे सिजर करावे लागेल अन्यथा गुंतागुंत वाढत जाईल असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिजर केले व बाळाला आमच्या ताब्यात दिले .
पेशंटविषयी उडवाउडवीची उत्तरं, नंतर गुंतागुंत वाढली अन्
यावेळी शितलचे ऑपरेशन कसे झाले ?तिची तब्येत कशी आहे? असे डॉक्टरांना विचारले असता त्यांनी घाई घाईने तुम्हाला एकदा सांगितले ना पेशंट बरे आहे.. पुन्हा पुन्हा विचारू नका असे उत्तर दिले. शितलच्या बाळाची शारीरिक स्थिती नाजूक असल्याने डॉ. बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळाला बाळरोग तज्ञ डाॅ.करंजकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले .तर शितल हिला ऑपरेशन थेटर मध्ये ठेवले. त्यामुळे शितलीची शारीरिक स्थितीबद्दल काळजी वाटू लागली. नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना वारंवार विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता शितल करगळ हिला ऑपरेशन थेटर मधून बाहेर आणले व ऑपरेशन दरम्यान पेशंटचा रक्तस्त्राव खूप झाला आहे. त्यामुळे पेशंटला तातडीने रक्त भरणे गरजेचे आहे. त्यामुळे प्लाझ्मा व रक्त घेऊन या असे सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सहा पिशव्या रक्त व चार बॅग प्लाजमा आणून दिला . तरीदेखील शितलची अवस्था नाजूक व गुंतागुंतीची होऊ लागली.
ऑपरेशनचे टाके उसवून पुन्हा ऑपरेशन?
त्यावेळी डॉक्टर बिनवडे यांनी नातेवाईकांना बोलून तुमचे पेशंट पुढील उपचारासाठी बाहेर घेऊन जावे लागेल असे सांगितले. माझ्या हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपण पेशंटला अहिल्यानगर येथे मेक केअर हॉस्पिटल येथे घेऊन जाऊ व त्या ठिकाणी पेशंट पोचेपर्यंत पाच डॉक्टरांची तज्ञ टीम तैनात केली आहे .आपण तिथे गेल्यानंतर तातडीने उपचार होतील असे सांगितले. त्यानंतर डॉक्टर बिनवडे यांनी शहरातील ॲम्बुलन्समधून शितल हिला अहिल्यानगर येथील मेक केअर हॉस्पिटल आणले, परंतु येथे हॉस्पिटलमध्ये पेशंटला उपचारासाठी घेऊन गेले असता कोणतीही तातडीची सेवा मिळाली नाही. उलट तेथील डॉक्टरांनी दाखल करून न घेता बाहेर पाठवले. त्यामुळे तात्काळ उपचार मिळू शकले नाहीत. दरम्यान मयत शीतल करगळ हिने आपल्या आईशी बोलत असताना सांगितले की, डॉ. बिनवडे यांनी सुरुवातीला केलेले ऑपरेशनचे टाके उसवून पुन्हा एकदा ऑपरेशन केले आहे. यावेळी मला खूप त्रास झाला. त्यामुळे रक्त खूप गेली आहे. मेक केअर हॉस्पिटल येथे उपचार न मिळाल्याने एशियन नोबेल हॉस्पिटल, सावेडी अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले. या ठिकाणी शीतल हिचा मृत्यू झाला.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
डॉ.बिनवडे यांनी चुकीच्या बेजाबाबदारपणाच्या हलगर्जी व निष्काळजीपणे ऑपरेशन केल्यामुळेच शितल करगळ ही जा मृत्यू झाला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. शितल करगळ हिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यास नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली त्यामुळे नातेवाईकांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेऊन डॉ.राम बिनवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा येथे डॉ. बिनवडे यांच्या विरोधात मनुष्यदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:.























