Ratnagiri News : नेहमीप्रमाणे बँकेतून निघाली पण घरी परतलीच नाही; तीन दिवस बेपत्ता असलेल्या चिपळूणमधील तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडला
Ratnagiri News : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत पाण्यावर तरंगताना सापडला. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील ओमळी गावात ही घटना घडली.
![Ratnagiri News : नेहमीप्रमाणे बँकेतून निघाली पण घरी परतलीच नाही; तीन दिवस बेपत्ता असलेल्या चिपळूणमधील तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडला Left the bank as usual but never returned home the body of a women from Chiplun who was missing for three days was found in Dabhol creek Ratnagiri News : नेहमीप्रमाणे बँकेतून निघाली पण घरी परतलीच नाही; तीन दिवस बेपत्ता असलेल्या चिपळूणमधील तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/04/33dc9ae1062180bcbe69e62bf479b6f7169113225525283_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ratnagiri News : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत (Dabhol Creek) पाण्यावर तरंगताना सापडला. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण (Chiplun) तालुक्यातील ओमळी गावात ही घटना घडली. आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. निलीमा सुधाकर चव्हाण असं मृत तरुणीचं नाव आहे.
कामावरुन परत येण्यासाठी निघाली, पण घरी पोहोचलीच नाही
निलीमा सुधाकर चव्हाण ही महिला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली (Dapoli) शाखेत काम करत होती. मागील महिन्यात 29 जुलै रोजी ती नेहमीप्रमाणे बँकेतून ओमळी गावातील घरी परत येण्यास निघाली. परंतु या प्रवासादरम्यान ती वाटेतच बेपत्ता झाली. तीन दिवस घरी ती परतली नसल्याने पोलीस तक्रार करण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतर तिचा मृतदेह दाभोळच्या खाडीत पाण्यावर तरंगताना आढळला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिचे केस कापण्यात आले होते. शिवाय तिच्या भुवया देखील काढल्या होत्या. अतिशय वाईट अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता.
खेडमधील एसटी स्टँडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निलीमा दिसली होती. चिपळूणला जाणाऱ्या एसटीमध्ये बसताना दिसली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. ती कोणत्या स्टँडवर उतरली हे समजू शकलेलं नाही. शिवाय तिचा मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन 29 जुलैच्या रात्री 12.05 वाजता अंजनी रेल्वे स्टेशन दाखवत आहे.
पोलिसांकडून म्हणावं तसं सहकार्य मिळालं नाही, नातेवाईकांचा आरोप
दरम्यान दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करुनही खेड आणि दापोली पोलीस ठाण्याकडून पाहिजे, तसे सहकार्य मिळाले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत घडलेल्या घटनेचा तपास पोलीस लावत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका मुलीच्या नातेवाईकांनी काल घेतली होती. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. चिपळूणमध्ये काल जिल्ह्यातील मृत महिलेच्या समाज बांधवांनी आणि विविध सर्वपक्षीय नागरिकांनी चिपळूण पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि पोलिसांकडे लवकरात लवकर तपास करुन आरोपीला तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही मागणी केली.
...तर 15 ऑगस्टपासून उपोषणाला बसू
निलीमा चव्हाणची हत्या नेमकी का झाली याचं कारण समजू शकलेलं नाही. पोलीस तपासातूनच ही बाब समोर येईल. मात्र कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नाभिक समाजाने केली आहे. तसंच 12 ऑगस्टपर्यंत या घटनेचा तपास होऊन आरोपीला अटक न झाल्यास 15 ऑगस्टपासून उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा
Ratnagiri Accident : दापोलीत भीषण अपघात, वडाप गाडी-ट्रेलरची जोरदार धडक, आठ जणांचा मृत्यू, सात जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)