Sharad Pawar VIDEO : वसंतदादांचे सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली, तेव्हाचं राजकारणही सांगितलं
Sharad Pawar Pune Speech : वसंतदादांचे सरकार मी पाडलं, पण नंतर त्यांनीच नंतर मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. त्यावेळी राजकारण मोठ्या अंतःकरणाने केलं जायचं असं शरद पवार म्हणाले.

पुणे : वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते, पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्हा तरुणांचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळेच आम्ही वसंतदादांचे सरकार घालवले अशी जाहीर कबुली शरद पवारांनी दिली. ज्या वसंतदादांचे सरकार मी पाडले, नंतर त्यांनीच भूतकाळ विसरून, गांधी-नेहरुंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला असंही शरद पवारांनी म्हटलं. त्यावेळचं राजकारण कसे होते आणि आताचे राजकारण कसे बदलत गेलं याचा संदर्भ देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते.
राज्यात 1978 साली पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोदचा प्रयत्न झाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वसंतदादांचे सरकार पडले. त्यामागे शरद पवारांचा मोठा हात होता. त्यामुळेच शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा अनेकदा आरोप केला जातो. आता शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार मी पाडले असं जाहीर वक्तव्य केलं.
Sharad Pawar On Vasantdada Patil : शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, "वसंतदादा हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने स्वर्णसिंह काँग्रेसमध्ये होतो. पण निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाले. त्याला आम्हा तरुणांचा विरोध होता. नंतर आम्ही एकत्र आलो, पण आमच्या दोघांमध्ये एक अंतर होतं. त्यामुळेच आम्ही दादांचे सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो."
सरकार मी पाडलं, पण वसंतदादांनी मला पाठिंबा दिला
शरद पवार पुढे म्हणाले की, पुढे 10 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो. त्यावेळी मुख्यमंत्री कुणाला करायचा यासाठी बैठक झाली. त्यावेळी अनेक नावांची चर्चा झाली. पण दादांनी सांगितलं आता बाकी कोणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं. म्हणजे ज्या व्यक्तीचा सरकार मी पाडलं ती व्यक्ती गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंत:करणाने पुन्हा एकत्र येतं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसमध्ये होतं.
आता राज्यकर्त्यांकडूनच कामकाज बंद पाडलं जातं
पूर्वीच्या राजकारणाचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, पूर्वी मोठ्या मनाने राजकारण केलं जायचं. आता राज्यकर्त्यांकडूनच संसदेचं कामकाज बंद पाडलं जातं. हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारं आहे आणि तेच चित्र बदलायचं आहे. पुन्हा एकदा गांधी नेहरूंच्या विचारांची मांडणी करून देशाचा चेहरा बदलेल कसा याची काळजी घेऊ.
Sharad Pawar Pune Speech Today : शरद पवारांचे भाषणातील काही मुद्दे खालीलप्रमाणे,
वसंतरावांचं मार्गदर्शन आम्हा लोकांना मिळायचं. ही मोठ्या मनाची माणसं आहेत या सगळ्या लोकांचा अंतकरण हे फार मोठं होतं. यांनी महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी उभी केली आणि त्यामुळे वर्षानुवर्ष महाराष्ट्र देशातलं एक चांगलं राज्य म्हणून लौकिक टिकवू शकला. राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या ज्येष्ठ नेत्यांनी उभी केली आणि त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला.
मला आठवतंय काँग्रेसमध्ये आम्ही होतो. काँग्रेस दुभंगली. इंदिरा काँग्रेस वेगळी झाली स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली. आम्ही लोक स्वर्ण सिंग काँग्रेसमध्ये होतो ज्यात यशवंतराव चव्हाण साहेब होते. निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही.
आय काँग्रेसला काही जागा मिळाल्या, आम्हाला काही जागा मिळाल्या आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केलं. पण आम्हा तरुणांचा त्या वेळेला काँग्रेस (आय) वर राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे. त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते, पण त्यांनी शेवटी हे दोघे एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता.
त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्यामध्ये मी होतो. परिणाम काय झाला एक दिवस आम्ही ठरवलं दादांच सरकार घालवायचं. दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली.
सांगायचं कारण म्हणजे त्यानंतर 10 वर्षानंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कुणाला करायचं यासाठी वसंतदादांनी बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते. रामराव अदिक होते, शिवाजीराव निलंगेकर होते, आणखी अनेक नेते होते. त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली पण दादांनी सांगितलं आता बाकी कोणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं. म्हणजे ज्या व्यक्तीचा सरकार मी पाडलं ती व्यक्ती गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंत:करणाने पुन्हा एकत्र येतं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसमध्ये होतं.
आज देशातलं चित्र बदललं आहे. आम्ही पार्लमेंटमध्ये आहोत, पार्लमेंटचं 14 दिवसांचं अधिवेशन चालू आहे. 14 दिवसांमध्ये सातत्याने पार्लमेंटचं कामकाज ठप्प होतंय. आम्ही जातो, सही करतो आणि आत गेल्यानंतर दंगा सुरू होतो आणि सभागृह तहकूब होतं आणि मग दुसऱ्या दिवशी जावं लागतं. अशी स्थिती देशात यापूर्वी कधीही नव्हती.
राज्यकर्त्यांकडूनच संसदेचं कामकाज बंद पाडलं जाणं हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारं आहे आणि तेच चित्र बदलायचा आहे. म्हणून आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये एकत्र बसलो. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे असतील, त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, त्यामध्ये अन्य पक्षांचे नेते असतील, मी असेन आणि आम्ही ठरवलं रोज रोज सभागृह बंद पाडणं, महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं आणि सत्तेचा गैरवापर करणं ही जर भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असेल तर त्यासाठी आपण एकत्रित भूमिका घेतली पाहिजे. म्हणून पार्लमेंटच्या इतिहासामध्ये कधी झालं नाही असे 300 खासदार बाहेर आले आणि त्यांनी संयमानं, शांततेने आंदोलन केलं. आम्ही लोकांना अटक केली गेली आणि आम्हा 300 खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे सर्व कशासाठी तर लोकशाही टिकवायची आहे, संसदीय पद्धती टिकवायची आहे आणि त्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे.
काल मी प्रधानमंत्री यांचं भाषण ऐकलं. देशासाठी लाल किल्ल्यावरून एक दृष्टी देण्याचं काम सर्व प्रधानमंत्री करत असतात. आनंद आहे ते त्यांनी केल, पण प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून करत असणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जवाहरलाल नेहरूंचे नाव घेत नाहीत. मी अस्वस्थ होतो. आयुष्यातला उमेदीचा काळ ज्यांनी स्वातंत्र्यासाठी दिला, कशाचाही विचार केला नाही, घरादाराचा विचार केला नाही, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. जगात भारताची महती वाढवण्याचं काम केलं.
सध्याचे दिवस सोपे नाहीत. पण चिंता करण्याचं कारण नाही. आपण विचारधारा मान्य असलेल्या सगळ्यांना संघटित करू आणि पुन्हा एकदा गांधी नेहरूंच्या विचारांची मांडणी करून देशाचा चेहरा बदलेल कसा याची काळजी घेऊ.























