Pune News : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती
Indrayani River Bridge Collapses : रविवार असल्याने पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी हा पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

पुणे : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही लहाण मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला. ही घटना रविवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल झाले आहेत. कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे.
Pune River Bridge Collapses : रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी
रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Indrayani River Bridge Collapses : वाहून गेलेल्यांमध्ये लहाण मुलांचाही समावेश
कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर एक जुना पूल आहे. या पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते. सुट्टीचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यातच हा पूल कोसळल्याने अनेक जण वाहून गेले. यामध्ये काही लहान मुलेही असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. तसेच या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचल्याची माहिती आहे. या ठिकाणी अजूनही काही पर्यंटक अडकले आहेत, त्यांना वाचवलं जात आहे. या ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Pune Bridge Collapses : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही
कुंडमळा हे ठिकाण पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितलं जातय. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही. असं असलं तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असं असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
























